महाराष्ट्र राज्याने आर्थिक प्रगतीच्या दिशेने आपली वाटचाल अधिक वेगाने सुरू ठेवली आहे. दावोस(DAVOS) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(DEVENDRA FADNAVIS) यांनी महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा बनेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI) यांच्या मार्गदर्शनाखाली भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराचा महाराष्ट्रालाही मोठा लाभ होणार आहे. दरम्यान, २७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महसूल, कौशल्य व रोजगार, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागांशी संबंधित या निर्णयांमुळे राज्यातील विविध क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
याच काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा मंत्री गिरीश महाजन(GIRISH MAHAJAN) यांनी घेतला. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.तसेच, “राष्ट्र प्रथम” या उपक्रमांतर्गत प्रजासत्ताक दिनी देशभरातील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन करत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.