नवी दिल्ली- धार्मिक स्थळांवरून भोंगे हटविण्याच्या मुद्द्यावरून उत्तरप्रदेश, महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. मशिदींवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. आता अलाहाबाद कोर्टाने याबाबत महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरील बेकायदा भोंगे उतरविले आहे. तब्बल एक लाखांहून अधिक भोंगे उतरविण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या मुद्द्यावरून अलाहाबाद न्यायालयात बदायूं येथील नूरी मशिदीचे इमाम मुतवल्ली इरफान यांनी एक याचिका दाखल केली होती. मशिदींमध्ये लाऊड स्पीकर लावू द्यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. आमच्या आमच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणल्याचा हा प्रकार असल्याचे या अर्जात म्हटले होते.
न्यायाधीश विवेक कुमार बिर्ला आणि न्यायाधीश विकास बधवार यांच्या खंडपीठाने ही याचिका रद्द केली आहे. “अजान हा मुस्लिम धर्मियांचा महत्वपूर्ण विषय आहे, पण भोंग्यावरुन अजान देणे असे इस्लाममध्ये म्हटलेलं नाही. या विषयावर यापूर्वी सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आहे. त्यामुळे भोंग्यावर अजान म्हणण्यास परवानगी देऊ शकत नाही,” असे न्यायालयात आपल्या सुनावणीत म्हटलं आहे.