Leopard Attack Shirur : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबायला तयार नाही. पिंपरखेड गावात सोमवारी (१३ ऑक्टोबर २०२५) भरदिवसा (Leopard Attack Shirur ) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात साडेपाच वर्षांची बालिका शिवन्या शैलेश बोंबे हिचा करुण अंत झाला. गेल्या काही वर्षांतील या भागातील ही नववी बिबट्याच्या हल्ल्याची घटना असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा पकडून बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Afghanistan Pakistan Border Tension: अफगाणिस्तानन पाकिस्तानच्या 58 सैनिकांना केलं ठार
ही दुर्दैवी घटना सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली. पिंपरखेड येथील शेतकरी अरुण बोंबे हे त्यांच्या घरामागील शेतीत नांगरणीचे काम करत होते. त्यांची नात (Leopard Attack Shirur) शिवन्या त्यांना पिण्यासाठी पाणी घेऊन कामाच्या ठिकाणी जात होती. घरापासून केवळ ३०० मीटर अंतरावर असलेल्या शेतात उसाच्या दाट शेतीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शिवन्यावर झडप घातली. बिबट्याने तिच्या मानेवर आणि हातावर गंभीर जखमा केल्या.
ABHIMANYU PAWAR | MARATHWADA FLOOD: अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार अभिमन्यू पवार सरसावले
अरुण बोंबे यांनी हा थरार पाहिला आणि ते जीवाच्या आकांताने बिबट्याच्या दिशेने धावले. त्यांनी धाडस दाखवत बिबट्याच्या तावडीतून आपल्या नातीला सोडवण्यासाठी (Leopard Attack Shirur) संघर्ष केला. त्यांच्या प्रयत्नानंतर बिबट्या उसाच्या शेतीत पुन्हा गायब झाला. बिबट्याने हल्ला करताच शिवन्याने आरडाओरड केली, परंतु बिबट्याने गंभीर जखमा केल्यामुळे ती निपचित पडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिवन्याला तातडीने उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शिवन्याच्या मृत्यूमुळे बोंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण पिंपरखेड आणि परिसरातील ग्रामस्थ गोंधळलेले असून, त्यांनी वन विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उसाच्या शेतामुळे बिबट्यांना लपण्यासाठी हक्काची जागा मिळत असल्याने परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापूर्वीही याच भागात अनेक शेतकरी आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत.
या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वन विभागाकडे त्वरित आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, तत्काळ बिबट्याला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावले आहेत, तसेच लवकरच आणखी १० पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे बसवण्याची ग्वाही दिली आहे. या बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र, केवळ पिंजरे लावून तात्पुरता उपाय न करता, बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.