मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यामुळे अटक करण्यात आलेल्या राणा दांपत्याला अखेर मुंबई सेशन कोर्टाकडून सशर्त जामीन देण्यात आला. तब्बल 12 दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका झाली आहे. मात्र त्यांना मीडियासमोर बोलण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. आज पुन्हा राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयानं त्यांना दिलासा दिला आहे. 11 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कोर्टाने घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्याशी निगडीत बाबींवर राणा दाम्पत्याला भाष्य करता येणार नाही. त्याशिवाय पोलिसांच्या तपासाता अडथळे आणायचे नाहीत असेही कोर्टाने आदेश दिले आहेत. या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही अशीही अट घातली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असेही सांगितले आहे. कोर्टाच्या या अटींचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे.