मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या भाषणानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल सतर्क झाले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परीषदेत महासंचालक रजनीश शेठ यांनी महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या जय्यत तयारीची माहिती दिली. तसेच औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्षम असून राज ठाकरे यांच्यावर कारवाई करतील असेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत रजनीश सेठ यांनी महाराष्ट्र पोलीस दल कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहे. तसेच, आमची पूर्ण तयारी असल्याचे सांगितले.
कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आतापर्यंत मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधातमक कारवाई करण्यात आली आहे. लोकांना नोटीसा पाठवल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत. ८७ एसआरपीएफ जवान, ३० हजाराच्या वर होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या तैनात आहेत. सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत की कोणत्याही प्रकारे तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार ही परवानगी कोणालाही देऊ नये, असेही आदेश देण्यात आल्याचं महासंचालकांनी सांगितलं.
यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात विचारले असता त्यांनी म्हटलं, औरंगाबाद पोलीस आयुक्तानी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्षम आहेत. आवश्यक असल्यास औरंगाबाद पोलीस योग्य ती कारवाई करतील. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेच्या भाषणाचा पोलीस आयुक्तांना अभ्यास केला आहे. आवश्यक वाटल्यास पोलीस आयुक्त आजच राज ठाकरेंवर कारवाई करतील, असं रजनीश सेठ यांनी म्हटलं.