ठाकरे सरकार राज ठाकरे यांना अटक करणार का ? गृहमंत्र्यांसोबत आज बैठक

464 0

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत मशिदीवरील भोंगे यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर चार मे पर्यंतचा भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार असून या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या संदर्भात पोलिसांकडून दोन अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आले आहेत. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाची स्पेशल ब्रँच आणि एसआडीच्या औरंगाबाद शाखेनं हे अहवाल तयार केले आहेत. हे अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवण्यात येतील अशी माहिती औरंगाबादचे आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे. या अहवालानंतर आता राज ठाकरेंवर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे.

औरंगाबादचे पोलीस आयुक्त तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर करतील. त्याअनुषंगाने गृहखात्याची पुढील रणनीती असणार, आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यभरात 4 तारखेला मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता पाहता कशापद्धतीने हे प्रकरण थांबवता येईल याबाबत चर्चा होईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील.

मशिदीवरील भोंगे हटवावे यामागणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य केले. त्यानंतरच्या उत्तरसभेत आणि औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी ४ मे रोजी ज्याठिकाणचे लाऊडस्पीकर हटणार नाहीत तेथील मशिदीसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावू असा अल्टीमेटम सरकारला दिला आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

३ तारखेला ईद आहे. त्या सणाला गालबोट लावायचं नाही. पण ४ तारखेपासून ऐकणार नाही. जिथे जिथे मशिदींवर भोंगे असतील, त्या त्या ठिकाणी लाऊड स्पीकरवर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. यांना विनंती करून समजत नसेल, तर मग आमच्यासमोर पर्याय नाही, अशा शब्दांत राज यांनी थेट इशारा दिला होता. मशिदीतून सुरू झालेला भोंगा आताच्या आता बंद करा. नीट सांगितलेलं कळतच नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असा इशाराच राज यांनी दिला. आम्ही ४ तारखेपासून अजिबात शांत बसणार नाही. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, ती यांना दाखवावीच लागेल. देशातल्या हिंदूंना माझी विनंती आहे. ४ तारखेपासून ज्या ज्या मशिदींसमोर भोंगे दिसतील, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा आणि अनेक वर्षे जुना असलेला हा प्रश्न सोडवा, असं आवाहन राज यांनी केलं.

शिवतीर्थावर मनसे कार्यकर्त्यांची थोड्याच वेळात बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली असून याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक होणार आहे. मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार असून या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!