हा तर मृतांच्या नातवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – देवेंद्र फडणवीस
मुंबई : पहलगाममध्ये पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या ही गोष्ट नाकारून, जे लोक या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, अतिरेक्यांनी धर्म विचारून मारले, हे मृतांच्या नातेवाईकांनी
त्यांचे म्हणणे माध्यमांना जाहीरपणे सांगितले. त्यामुळे वडेट्टीवार यांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे विधान करू नये. ते तिथे घटनास्थळी होते का? इथे बसून अशी विधान करणे हे अतिशय वाईट आहे. याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावे? हे मला समजत नाही. माझ्याकडे यासाठी शब्द नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील सर्वच पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, याप्रकरणी अद्याप आकडा स्पष्ट झाला नाही. पण पोलिस विभाग लवकरच हा आकडा जाहीर करेल. पण मी स्पष्ट करतो की, जे पाकिस्तानी नागरिक भारतातून बाहेर गेले पाहिजेत, अशा सर्व नागरिकांची ओळख पटवण्यात आली, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांचे ट्रॅकिंगही सुरू आहे. त्यांची आकडेवारी लवकर सांगितली जाईल. पण केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीतील कोणताही नागरिक आम्हाला सापडला नाही असे नाही. मंत्री त्यांना झालेल्या ब्रिफिंगच्या आधारावर बोलतात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील काही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे विधान केले होते. पत्रकारांनी यावेळी फडणवीसांना छेडले असता त्यांनी अशी कोणतीही बाब नसल्याचे स्पष्ट केले.
मी पुन्हा एकदा सांगतो. जे पाकिस्तानी नागरिक बाहेर जायला पाहिजे, अशा सर्वच नागरिकांची ओळख पटली आहे, असे ते म्हणाले.
जे पाकिस्तानी नागरिक म्हणजे सिंधी समाजाचे लोक लाँग टर्म व्हिसावर आलेत, त्यांनी नागरिकत्वासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे त्यांना केंद्राच्या आदेशांतर्गत भारत सोडण्याचे कारण नाही. पण जे लोक शॉर्ट टर्म व्हिसावर आलेत, त्यांना ४८ तासांत भारत सोडण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपली जबाबदारी पूर्ण नेटाने पार पाडली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.