दहावीचे पेपर संपल्यानंतर अगदी आनंदात असलेल्या दोन मित्रांनी वडापाव खायला सज्जनगडावर जायचं ठरवलं.. घरातून बाहेरही पडले मात्र पुन्हा घरी परतलेच नाहीत… ही घटना घडली साताऱ्यातील सज्जन घाट परिसरामध्ये.. दहावीची परीक्षा दिलेल्या या दोन अल्पवयीन मुलांचा भीषण अपघात झाला ज्यामध्ये दोघांचाही मृत्यू झालाय.वेदांत शरद शिंदे आणि प्रज्वल नितीन किर्दत अशी या दोघांची नावं आहेत.
वेदांत आणि प्रज्वल हे दोघे मित्र सज्जनगडापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोडे बुद्रूक गावात राहत होते. हे दोघी बालपणीपासूनचे मित्र असून दोघांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली. दुपारच्या सुमारास या दोघांना वडापाव खायची इच्छा झाली. त्यामुळे सज्जनगड परिसरात प्रसिद्ध असलेला वडापाव खाण्यासाठी हे दोघेही निघाले.
त्यांनी सज्जनगडाकडे जाणाऱ्या एका गाडीला लिफ्ट मागून गावातून सज्जनगडावर गेले होते. तिथे फिरून झाल्यावर दोघांनी एकत्र वडापाव खाल्ला आणि चालत घराकडे निघाले होते. वाटेतच त्यांनी एका दुचाकी चालकाला हात करून पुढे गावात सोडण्याची विनंती केली. चालकाने लगेचच दोघांना दुचाकी वर बसवलं. काही अंतरावरच घाट रस्ता सुरू झाला. तेवढ्यात मागून आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी आहे.या अपघाता प्रकरणी पिकअप चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बालपणीपासूनचे जिवलग मित्र असलेल्या या दोघांच्या अकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर घाट रस्त्यांवर लहान वाहनांच्या आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.