मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने महाराष्ट्रात परत आणण्याच्या मुद्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. महायुती सरकारमधील नेत्यांमध्ये श्रेयवादाची आणि स्वतःच्या मार्केटिंगची स्पर्धा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, जे कधी विमानात बसले नाही त्यांना पण एकनाथ शिंदे यांनी विमान प्रवास घडवून आणला, अशा पद्धतीचे विधान म्हस्के यांनी केले. महायुतीच्या नेत्यांना ही वेळ काय आणि कोणी कधी, कसले श्रेय घ्यायचे याचे सुद्धा भान राहिले नाही. पर्यटकांना सुखरूप आणणे महत्वाचे की, विमान प्रवास? असा सवाल त्यांनी केला. पर्यटकांना सुखरूप परत आणले म्हणून त्याचे श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.