मुंबई : देशावरील संकटाच्या काळात जो काही निर्णय घ्यायचा, तो सरकार घेतच असते. मात्र, आम्ही केंद्रसरकारच्या पाठीशी आहोत, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, देशावरील संकटाच्या काळात सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची सर्व पक्षांची भूमिका असते. काश्मीरचा प्रश्न गंभीर असल्याने या मुद्यावर एक वा दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याची गरज आहे. त्यामध्ये विरोधकांच्या सूचना आणि एकंदरीत राष्ट्राची भावना त्यावर चर्चा घडवून सर्वच पक्षांच्या नेत्यांना बोलण्याची संधी देण्याची गरज आहे.
काश्मीर आणि मणिपूर हे अत्यंत धगधगते प्रश्न आहेत. या प्रश्नावर संसदेत चर्चा झाली तर सरकारला चांगली दिशा मिळू शकेल. संविधानावरील चर्चेदरम्यान काश्मीरवर बोलण्यास फार कमी वेळ मिळाला. या विषयावर हिंदू – मुसलमान राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्र म्हणून आमच्या भावना आणि संवेदना या सरकारसोबत आहेत.
सर्वपक्षीय बैठकीला मी जात नाही, पण आमच्या पक्षातर्फे कोणीतरी नक्कीच उपस्थित राहील. इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये बिकट परिस्थिती हाताळली. पाकिस्तानचे दोन तुकडे करून त्यांनी कायमची अद्दल घडवली होती. त्यामुळे आता आम्हाला इंदिरा गांधींची आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पहलगाम हल्ला केवळ काश्मीर अथवा पर्यटकांवर नाही तर हा देशावरील हल्ला आहे. ही परिस्थिती हाताळण्यास सरकार दुबळे असेल तर आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहून त्यांना ताकद देऊ, असेही राऊत यांनी म्हटले.