खेड तालुक्यातील परसुल गावात भीषण पाणी टंचाई जाणवत असून गावातील एकाच खोल विहिरीला पिण्यायोग्य पाणी आहे. हे पाणी जून शेवट पर्यंत पुरावे म्हणून ग्रामपंचायतीने महत्त्वाचं निर्णय घेतला असून प्रत्येक कुटुंबाला दररोज केवळ दोन हंडे पाणी वापरण्याचा नियम करण्यात आलाय.
उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईचा सामना अनेक गावांना करावा लागत आहे. ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाळ्यात गावाला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गाव पातळीवर प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र अशातच आता परसुल ग्रामपंचायतीने काढलेल्या अजब नियमाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विहीरीतून 2 हंडा पाण्यापेक्षा एकही हांडा अधिक घेतला तर 100 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा नियम ग्राम पंचायतीने लावला आहे. या गावात कायमच पाणी टंचाई असते. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते.गावकऱ्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबासाठी फक्त दोन हांडे पाणी देण्याचा नियम केलाय. मात्र ग्रामस्थांकडून अद्याप दंड घेण्यात आला नसून फक्त सर्वांनी पाणी जपून वापरावं व सर्वांना वचक बसवा म्हणून हा नियम केला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलय.