जीवापाड प्रेम, कुटुंबाच्या विरोधात विवाह अन् सुखाचा संसार अखेर, राकेशनं सांगितलं गौरीच्या खुनाचं कारण

714 0

ऑफिसर असलेल्या पतीचा प्रियकरा सोबत मिळून खून करून त्याचे तुकडे करून ड्रम मध्ये भरून ठेवणाऱ्या राक्षस पत्नीची चर्चा देशभरात होत असताना अशाच पद्धतीचं आणखी एक प्रकरण काल समोर आलं. सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या पतीने आपल्याच पत्नीचा खून करून मृतदेहाचे तुकडे करून बॅगेत भरल्याची घटना घडली आहे. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून या हत्ये मागचं कारण आता समोर आलंय

हे प्रकरण आहे उच्चशिक्षित पती-पत्नी अर्थात राकेश खेडेकर आणि गौरी सांबरेकर यांचं… राकेश आणि गौरी यांनी दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला. त्यानंतर हे दोघेही मुंबईला शिफ्ट झाले. तर कामानिमित्त दोन महिन्यांपूर्वीच त्यांना बंगळुरूला शिफ्ट व्हावं लागलं. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. हे प्रकरण पोलिसांपर्यंत ही गेलं होतं. पोलिसांनी दोघांचीही समजूत घालून सुखाने संसार करण्याचा सल्ला दिला.‌ मात्र दोन दिवसांपूर्वीच या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले. हा वाद शीगेला पोचल्याने राकेश खेडेकरनं पत्नी गौरीला चाकूने वार करत हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे बॅगमध्ये भरून बंगळूर हून मुंबईला निघाला. त्याने आपल्या वडिलांना फोनवर सर्व सांगितलं. गौरीच्या कुटुंबीयांना कळवायलाही लावलं.

मात्र वाटेत त्याने झुरळ मारण्याचे औषध आणि फिनाईल प्यायलं. काही वेळानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने शिरवळजवळ तो रस्त्यात थांबला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विचारपूस केल्यानंतर राकेश खेडेकर ने गुन्ह्याची कबुली दिली‌. आणि हे प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर त्याला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याविषयीची माहिती ही ससून रुग्णालयाचे डीन यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राकेश हा गौरीच्या मामाचा मुलगा आहे. या दोघांचे अनेक वर्षांपासून प्रेम संबंध. मात्र हे लग्न दोघांच्याही कुटुंबीयांना मान्य नव्हतं. अनेक वर्ष कुटुंबियांनी या दोघांना विरोध केला. मात्र लग्न करू तर एकमेकांशीच असं या दोघांनी ठरवलं होतं. त्यामुळेच अखेर दोन वर्षांपूर्वी या दोघांचं लग्न झालं. मात्र प्रेम विवाह नंतर या दोघांमध्ये इतकं वितुष्ट का आलं ? हाच प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

हे प्रकरण समोर आल्यापासून राकेशने गौरीचा इतका निर्दयी खून का केला हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपासही सुरू होता. गौरी ही राकेश बरोबर वारंवार भांडायची. लग्न अगोदरही ती तशीच होती, त्यामुळेच आम्ही राकेश ला तिच्याशी लग्न करू नको हे सांगत होतो, असं राकेशच्या वडिलांचं म्हणणं आहे. मात्र आता स्वतः राकेशने त्याने खून का केला याचं कारण सांगितलं आहे. राकेश आणि गौरीचे रात्री वाद झाले. गौरी नोकरीच्या शोधात होती. ती राकेश ला पुन्हा मुंबईला जाऊया असा आग्रह करत होती. मात्र बंगळुरूमध्ये भाड्याने घेतलेल्या फ्लॅटचं डिपॉझिट आत्ताच भरलं आहे. घर भाड्याचाही खर्च आहे. त्यामुळे पुन्हा मुंबईला जायला नको, असं राकेश तिला सांगत होता. मात्र ती ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. तिने राकेशवर चाकू उगारला. त्याला मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळेच स्वतःला वाचवण्यासाठी आणि रागाच्या भरात त्याच चाकूनं राकेश आणि गौरीला भोसकलं. आणि मृतदेहाचे तुकडे करून बॅगमध्ये भरले.

विष प्राशन केल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आरोपी राकेशची प्रकृती स्थिर आहे. त्याची प्रकृती सुधारली की लगेच त्याला स्थानिक पोलिसांकडून बेंगलोरला नेण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा खून झाला त्या पोलिसांकडून राकेशचा ताबा घेतला जाईल आणि पुढचा तपास सुरू करण्यात येईल. हत्याच्या रात्री नेमकं काय घडलं ? राकेशने दिलेला कबुली जबाब हा खरा आहे का ? या सगळ्याचा शोध घेतला जाईल. मात्र एकेकाळी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या राकेश आणि गौरी यांच्या नात्याचा हा भयंकर शेवट प्रत्येकालाच हादरवून टाकणारा आहे

Share This News
error: Content is protected !!