पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे. राज्यातील विविध आवश्यक ठिकाणच्या रोपवेची कामं सुरू करण्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एनएचएलएमएल (NHLML) मार्फत राज्यात 45 रोपवे करण्यात येणार आहेत. त्यापैकी आठ रोपवे हे पुणे जिल्ह्यात असणार आहेत. ज्यामुळे पर्यटनाला आणखी चालना मिळेल. आणि स्थानिक नागरिकांना रोजगारही मिळेल.
केंद्र सरकारने देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्वतमाला योजना आणली आहे. केंद्र सरकारच्या या पर्वतमाला योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 45 रोपवेच्या कामांना मान्यता मिळाली आहे. विविध गड, किल्ले, दुर्मिळ भाग, धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळांवर हे रोपवे तयार केले जाणार आहेत.
महाराष्ट्र सरकारकडूनही या प्रकल्पांला मान्यता मिळाली असून प्रत्यक्षात कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. याप्रमाणे पुण्यातही आठ प्रमुख पर्यटन, धार्मिक आणि दुर्मिळ स्थळांवर रोपवे तयार केले जाणार आहेत. ही आठ ठिकाण नेमकी कोणती आहेत पाहूया… वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगड, पुण्यातील सिंहगड आणि जुन्नर मधील किल्ले शिवनेरी या तीन गडांवर रोपवे उपलब्ध होणार आहेत. हे तीनही किल्ले छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यातील महत्त्वाचे किल्ले आहेत.
या किल्ल्यांवर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अनेकदा वृद्धांना आणि लहानांना ट्रेकिंग करणं शक्य नसल्याने या गडांवर जाणं टाळलं जातं. मात्र रोपवेमुळे आता हे शक्य होणार आहे. याबरोबरच खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा आणि भीमाशंकर तर जुन्नर मधील लेण्याद्री पर्वत आणि जेजुरीतील कडेपठार या धार्मिक स्थळांवरही रोपवेची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासह जुन्नर मधील दुर्गम भागात निसर्गाच्या सौंदर्यात वसलेल्या दाऱ्याघाटावरही रोपेने जाणं शक्य होणार आहे.
पुण्यातील या आठही स्थळांवर रोपवे सुविधा देण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. दरम्यान आता या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यामुळे लवकरच प्रत्यक्षात कामही सुरू होणार आहे. निसर्ग सौंदर्यात वसलेल्या गड किल्ल्यांना, धार्मिक स्थळांना व पर्यटन स्थळांना भेटी देणं लहानांसह ज्येष्ठांना आणि दिव्यांगांनाही शक्य होणार आहे. गाडीने किंवा पायी अनेक तासांचा प्रवास करून ज्या ठिकाणी पोहोचावं लागतं तिथे आता काही मिनिटात पोहोचता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे रोपवे तयार व्हावेत. जेणेकरून पर्यटनाला आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल.