वडलांचा हात डोक्यावर असेल तर देवाची ही गरज पडत नाही, असं म्हटलं जातं. मात्र पुण्यातल्या एका वडलांनी त्या देवालाही रडू येईल इतकं राक्षसी कृत्य केलं आहे. पुण्यातील एका नराधम बापाने आपल्याच तीन वर्षांच्या मुलाचा गळा कापून खून केलाय. या खुना मागचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल… पाहूयात पुण्यातील बाप रुपी राक्षसाच्या गुन्ह्याची संपूर्ण कहाणी…
या नराधम आरोपीचं नाव माधव टीकेटी असं असून तो मूळचा विशाखापट्टणमचा आहे. गेल्या काही वर्षांपासून तो त्याच्या कुटुंबासह पुण्यात स्थायिक झाला. वडगाव शेरी परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत ते राहत होते. माधव हा आयटी इंजिनियर असून त्याची पत्नी ही उच्चशिक्षित आहे. या दोघांना एक मुलगी व एक मुलगा असे दोन गोंडस मुलं होती. सारं काही चांगलं सुरू असताना पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. त्याच्याच रागातून पत्नी मुलांना घेऊन विशाखापटनमला निघून गेली. तर इकडे माधव याने नोकरी सोडून दिली. व तो एकटाच पुण्यात राहत होता. तीन दिवसांपूर्वी मुलीची परीक्षा असल्याने पत्नी मुलांना घेऊन पुण्यात आली. गुरुवारी सकाळी पुन्हा पती-पत्नीत वाद झाले. या वादातून तो मुलगा हिम्मत याला घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर पहिल्यांदा तो एका बारमध्ये आणि नंतर एका सुपरमार्केटमध्ये गेला. त्यानंतर तो मुलाला घेऊन चंदननगरजवळील जंगलात गेला. रात्री उशिरापर्यंत माधव आणि आपला मुलगा घरी परतला नसल्याने माधवची पत्नी घाबरली. माधवचा फोनही बंद लागत होता म्हणून तिने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने माधवचा तपास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे माधव चंदननगरजवळील एका लॉजवर दारूच्या नशेत सापडला. त्याच्याकडे मुलाची चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. मुलगा हडपसर बस स्टँडवर हरवला असं तो सांगत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच मुलाचा गळा चिरून खून केल्याचं त्याने सांगितलं. त्याच जंगलात या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. अंगाचा थरकात उडवणारं ते दृश्य पाहून पोलीस कर्मचारी ही हळहळले. महिला पोलिसांनी हंबरडा फोडला. आपल्याच पोटच्या गोळ्याला कुणी इतकं निर्दयीपणे कसं काय संपवू शकतं ? या प्रश्नाने सगळ्यांच डोकं चक्रावलं होतं. दरम्यान आरोपी बापाने हे सगळं बायकोच्या चारित्र्यावर संशय असल्याने केल्याचं उघड झालं.
चिमुकल्या हिम्मतचा काहीच दोष नसताना केवळ पती-पत्नीच्या वादातून नराधम बापाने त्याला संपवलं. या घटनेने संपूर्ण कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. आपल्याच मुलाबद्दल एखादा बाप इतका निष्ठुर कसा होऊ शकतो हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. मात्र एकीकडे अशिक्षित, बेरोजगार आणि चुकीचं संगतीत राहणाऱ्या तरुणांमध्ये गुन्हे करण्याचे विकृती वाढत असताना दुसरीकडे उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू असलेल्या व्यक्तींकडूनही अशा पद्धतीचे गुन्हे होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळेच ही विकृती रोखायची कशी हा प्रश्न समाज म्हणून सगळ्यांनाच पडायला हवा. दरम्यान या प्रकरणातील आरोपी माधव टीकेटी याला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.