संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नुकतंच सीआयडी ने संतोष देशमुख हत्या प्रकरणातीला आरोपींविरुद्ध न्यायालयात 1400 पानाचे आरोप पत्र दाखल केला आहे. परंतु काल समाज माध्यमांवर संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर महाराष्ट्रभर आरोपींच्या विरोधात संतापाची एकच लाट उसळली. आणि त्याच अनुषंगाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज नैतिकतेच्या आधारावर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
या मुद्यावर बोलताना ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मिलिंद पवार म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींनी शांत डोक्याने संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यामुळे तपास यंत्रणांनी या सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे दुर्मिळातली दुर्मिळ केस असून याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षाही होऊ शकते.
या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात छोटासा पुरावा मिळाला तरीही पोलीस त्यांना सहआरोपी करू शकतात. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जामीन मिळालेला सिद्धार्थ सोनवणे याच्या विरोधात तपास यंत्रणा पुरावे मिळाल्यास त्याचा जामीन रद्द करून त्यालाही अटक केली जाऊ शकते. संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणांनी आता तपास पूर्ण केला असून, न्यायालयात दोषारोप पत्रातील पुरावे तपास यंत्रणांना सिद्ध करावे लागणार आहेत. असे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मिलिंद पवार म्हणाले