राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभरातील सर्व बसस्थानके व आगारांमध्ये सीसीटीव्ही एआय तंत्रज्ञानावर आधारित अद्यावत यंत्रणा उभी करावी. सर्व बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा व्यवस्थित आहेत का? याची तपासणी करावी. तसेच बसमध्ये सिस्टीम यंत्रणा बसवण्याचं काम वेगवान गतीने पूर्ण करावे. तसेच बस स्थानकावर स्थानिक पोलिसांची गस्त वाढवावी. तसेच आगार व्यवस्थापकांनी आगारांमधील निवासस्थानांमध्येच वास्तव्य करावे असे आदेश राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी दिलेत.
बसस्थानक आणि घरामध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टींची माहिती सुरक्षारक्षकाकडे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.तसेच चालक वाहक यांनी आगारात आणलेली बस सोडताना ती बंद असल्याची खात्री करावी. बसमध्ये दरवाजासह खिडक्या ही बंद असल्याची खात्री करून घ्यावी. सुरक्षारक्षकांनी परिसरात फिरणाऱ्या अनोळखी इसमांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे निर्देश परिवहनमंत्र्यांनी दिले आहेत.
त्याचबरोबर सुरक्षेसह स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यामुळे बसस्थानकांवर स्वच्छतेबाबत कुठलीही तडजोड करू नये. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यात याव्यात. महिलांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात यावी. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा वेळोवेळी आढावा घ्यावा असे त्यांनी सांगितले . याचबरोबर राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद असून या पदांवर भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याची सूचना मंत्री सरनाईक यांनी केली.