पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. वारंवार ज्या गुंडांकडून वस्ती पातळीवर वर्चस्ववादासाठी गुन्हे केले जातात, अशा गुन्हेगारांवर एमपीडीए (MPDA) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये येरवड्यातील कसबे टोळीचा मोरक्या, गुंड प्रफुल्ल उर्फ गुड्डया गणेश कसबे याच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी आता थेट नागपूर कारागृहात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, तसेच औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक प्रगती असलेल्या व्यक्तींच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी एमपीडीए कायदा करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत कारवाई झाल्यास आरोपीला एका वर्षासाठी तत्काळ स्थानबध्द करण्यात येतं अर्थात त्यांची रवानगी भेट कारागृहात केली जाते. हीच कारवाई गुड्ड्या कसबे याच्यावर करण्यात आली आहे. कसबे हा येरवडा भागातील लक्ष्मीनगर परिसरात राहणारा गुंड आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गंभीर मारहाण करणे, शस्त्र बाळगणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अशा पद्धतीचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. त्याच्यावर अनेकदा कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्याला तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती त्याचबरोबर प्रश्न पुणे जिल्ह्यातून त्याला दोन वर्षांसाठी तडीपारही करण्यात आलं होतं. दोन वर्षानंतर तो पुन्हा येरवड्यात परतला. त्यानंतर त्याने पुन्हा दहशत माजविण्यास सुरुवात केली. त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेचं वातावरण होतं. त्यामुळेच त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी तयार केला. हा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठवण्यात आला आणि त्यांनी लगेचच प्रस्तावाला मंजूर दिली. त्यानंतर लगेचच त्याला ताब्यात घेऊन नागपूर कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.
100 सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’
पुण्यातील सराईत गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलीस दलाने ही नवी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील 100 गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोथरूड परिसरात धुमाकूळ घातलेल्या गजा मारणे टोळीवरही मकोका लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. त्यामुळेच कारवाईच्या धडक्यानंतर पुण्यातली गुन्हेगारी कमी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.