राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 19 तारीख उलटली तरी अजूनही मिळालेला नाही. त्यामुळेच लाडकी बहिणी योजनेचा (LADKI BAHIN YOJANA) या महिन्यातला हप्ता कधी मिळणार आणि जो हप्ता पंधराशे वरून 2100 होणार होता, तो नेमका कधी होणार आहे याविषयीची सुद्धा माहिती समोर आली आहे.
राज्यातील बहुचर्चित लाडकी बहीण योजना तत्कालीन महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली. सुरुवातीला लाखो महिलांना सरसकट योजनेचा लाभ देण्यात आला. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास आम्ही पंधराशे वरून 2100 रुपये हप्ता करू असं आश्वासन देण्यात आलं. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन करण्यात याच लाडकी बहिणी योजनेचा मोठा वाटा ठरला. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेतील अनेक लाभार्थी महिलांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या महिलांनी योजनेच्या निकषांमध्ये बसत नसतानाही अर्ज भरले आणि लाभ मिळवला त्या महिलांची नावं वगळण्यात येत आहेत. मात्र योजनेत बसत असलेल्या महिलांचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा शेवटचे दहा दिवस राहिलेले असतानाही मिळालेला नाही. त्यामुळे आपलंही नाव योजनेतून वगळलं तर नाही ना ? असा प्रश्न महिलांना सतावत होता. मात्र या महिन्यातील हप्ता पुढच्या आठ दिवसांमध्ये नक्की मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे नव सरकार स्थापन झाल्यावर 2100 रुपये हप्ता मिळणार होता, मात्र तीन महिने उलटूनही हा हप्ता का मिळत नाही असा सवाल लाडक्या बहिणी करत आहेत. याचं निश्चित उत्तर अजूनही सरकारकडून देण्यात आलं नसलं तरीही राज्याच्या नव्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात याविषयीची तरतूद करून नवीन आर्थिक वर्षातच हा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
योजना बंद होणार
राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, अशा चर्चा सुरू होत्या. या चर्चांना स्वतः अजित पवार यांनी ब्रेक लावलाय. ही योजना बंद होणार नाही मात्र निकषात बसत नसलेल्या महिलांना याचा लाभ घेता येणार नसल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. त्याचबरोबर सर्व अर्जांची छाननी सुरू असून निकषात बसत असलेल्या महिलांचे अर्ज कायम ठेवून त्यांना लाभ मिळत राहील, असं देखील जाहीर करण्यात आलं आहे.