माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत (TANAJI SAWANT) यांचा धाकटा मुलगा ऋषीराज सावंत (RUSHIRAJ SAWANT) याचं अपहरण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र सावंतांच्या मुलाचं अपहरण झालं नसून तो स्वतः मित्रांबरोबर बँकॉकला गेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर साडेचार तासातच ऋषिराज याला पुण्याला आणण्यात आलं. या सगळ्यांमध्ये बँकॉक (bangkok) ला जाण्याची ऋषीराजची इच्छा मात्र अपूर्ण राहिली.
मुरलीधर मोहोळ पोहोचले मदतीला
आपला मुलगा बँकॉकला निघाल्याचं तानाजी सावंत यांना कळताच त्यांनी लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांना फोन लावले. त्यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर हवाई नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील संपर्क साधून विमानाविषयीची सर्व माहिती काढण्याची विनंती केली. काही वेळातच हा मुलगा कोणत्या विमानाने कोणत्या मार्गाने जात आहेत याविषयी माहिती मिळाली. या मुलाने 68 लाख रुपये खर्च करून तब्बल 18 प्रवासी बसतील इतक्या मोठ्या आसन व्यवस्थेचं प्रायव्हेट चार्टर्ड प्लेन हे फक्त तीन लोकांसाठी बुक केलं होतं. ऋषिराज व त्याच्या दोन मित्रांना घेऊन हे प्लेन बँकॉकच्या दिशेने निघालं. प्लेन अंदमान निकोबार बेटाच्या जवळपासच्या भागात असताना पायलटला विमान परत फिरवण्याचा संदेश पाठवण्यात आला. त्याचबरोबर विमानात बसलेल्या लोकांना याविषयीची कुठलीही माहिती द्यायची नाही असं देखील सांगण्यात आलं. त्यामुळे हवेतला हवेतच या विमानाने न्यूटर्न मारला आणि पुढच्या एक दीड तासात हे विमान पुणे विमानतळावर लँड झालं. पुणे विमानतळावर दाखल झाल्यानंतर ऋषिराज सावंतला आपण पुन्हा पुण्यातच आल्याचं समजलं. तोपर्यंत त्याला आपल्या माजी मंत्री असलेल्या वडिलांनी संपूर्ण यंत्रणा भेटीस धरून आपल्याला परत आणण्यासाठी जो डाव मांडला होता त्याविषयीची जराही कल्पना नव्हती.
ऋषिराजचा जबाब
ऋषिराज सावंत पुणे विमानतळावर दाखल होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी चालू केली. घरी न सांगता ऋषिराज मित्रांसह बँकॉकला का निघाला ? त्यासाठी 18 आसनी प्रायव्हेट चार्टर्ड प्लेन बुक का केलं ? याविषयी चौकशी करण्यात आली. त्यावेळी नुकतंच आपण दुबईला जाऊन आलेलो होतो. आता पुन्हा बँकॉकला जायची गोष्ट, घरी सांगितलं तर पप्पा ओरडले असते. त्यामुळे घरी न सांगता आपण निघालो. तर बँकॉकला आपण एका बिजनेस मीटिंगसाठी जात असल्याचा जबाब त्यांनी पोलिसांकडे नोंदवला आहे.
बँकॉक ट्रीपला बायकोचा नकार
अनेक दिवसांपासून ऋषिराजला मित्रांसह बँकॉकला जायचं होतं. मात्र पत्नी परवानगी देत नसल्यामुळे तो जात नव्हता. अखेर कुटुंबीयांना न सांगता बँकॉकला जायच्या उद्देशाने त्याने हे प्रायव्हेट चार्टर्ड प्लेन बुक केलं. त्यानंतरच कदाचित सावंत कुटुंबीयांमध्ये वाद झाले आणि याच वादातून ऋषीराजने तडका फडकी बँकॉकला जाण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ऋषिराजच्या सांगण्यानुसार जर तो केवळ बिझनेस डील साठी जात होता. तर कुटुंबियांनी त्याला अडवण्याचं काही कारण नव्हतं. त्यामुळे ऋषिराजला बँकॉकला कामासाठी जायचं होतं की फिरण्यासाठी जायचं होतं या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.