शिर्डीतील साई संस्थानच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता दुसरा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. या दुहेरी हत्याकांडाचं कारणही समोर आल आहे.शिर्डीत सोमवारी पहाटे दुहेरी हत्याकांड करत दहशत माजवणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतल आहे. यातील एक आरोपी किरण सदाफुलेला घटनेच्या काही तासात अटक करण्यात आली होती. तर दुसरा आरोपी राजू माळी यालाही आता अटक करण्यात पोलिसांना यश आलाय. राजू माळी हा आरोपी 36 तासापासून पोलिसांना चकवा देत होता. शिर्डी शहरातच एका काटेरी झुडपात तो लपून बसला होता. शिर्डीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने त्याला पकडलं आहे.
आरोपी किरण सदाफुले आणि राजू माळी या दोघांनी सोमवारी पहाटे साईसंस्थानमध्ये ड्युटीवर येणारे सुभाष घोडे आणि ड्युटीवरुन घरी जाणारे नितीन शेजूळ यांच्यावर धारदार शस्त्रांने वार करत त्यांची निघृण हत्या केली होती. तसेच कृष्णा देहरकर यांना देखील गंभीर जखमी केल होत. यामुळं सोमवारपासूनच शिर्डी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होत. दरम्यान पकडण्यात आलेल्या आरोपींनी दारुच्या नशेत लुट करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याची प्राथमिक कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगीतलं आहे.