पंचांशी वाद, कुस्तीतून बाद!; शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडबाबत राज्य कुस्तीगीर परिषदेनं घेतला मोठा निर्णय

1184 0

महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेत उपांत्‍य सामन्यात व अंतिम सामन्यात पंचाचा निर्णय मान्य न करता गोंधळ घातल्‍याप्रकरणी कुस्‍ती संघटनेने शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांवर कारवाई केली.

या दोन्ही घटनांनंतर राज्य कुस्तीगीर परिषदेनं मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही पहिलवानांवर राज्य कुस्तीगीर परिषदेनं तीन वर्षांची बंदी घातली आहे. अंतिम सामन्यानंतर पार पडलेल्या कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पुढील तीन वर्षे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड दोघांनाही कुस्ती खेळता येणार नाही.

राज्य कुस्तीगीर परिषदेचं म्हणणं काय?

राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी सांगितलं की, “पंचांनी जो निर्णय दिला होता, त्याच्याविरोधात पहिलवानांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी खिलाडूवृत्तीने खेळायला पाहिजे होतं. त्यांनी पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे हे चुकीचं कृत्य केलं. त्यामुळेच शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडने पंचांसोबत वाद केला आणि शिवीगाळही केली. हे एका खेळाडूला शोभणारं नाही. त्यालाही तीन वर्षे कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.”

Share This News
error: Content is protected !!