विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मित्र पक्ष असलेल्या समाजवादी पक्षानं (सप) आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
समाजवादी पक्षाच्या आमदारांकडून शपथ
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शपथ न घेण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली होती. मात्र, आघाडीची ही भूमिका डावलून समाजवादी पक्षाच्या दोन्ही नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. इतकंच नव्हे तर
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे जाहीर करत प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी यापुढं ‘मविआ’च्या ट्रॅकवरून आपली ‘सायकल’ चालवायला साफ शब्दांत नकार दर्शवला.
उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला ‘सप’चा विरोध
विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात आज पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. मात्र, विरोधी पक्षांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत या शपथविधीवर बहिष्कार टाकला. परंतु, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी महाविकास आघाडीची ही भूमिका नाकारत आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर अबु आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आमचा हिंदुत्वाचा मुद्दा कायम राहील, असं सूतोवाच केलं होतं. “हिंदुत्वाचा मुद्दा आणि बाबरी मशीद पाडणाऱ्यांचं अभिनंदन करून आमच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या लोकांसोबत मी कधीही राहू शकत नाही. शरद पवार आणि काँग्रेसनंही उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत राहण्याबाबत विचार करावा,” असं म्हणत अबु आझमी यांनी आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. दरम्यान, ‘या निर्णयाबाबत मी अखिलेश यादव यांच्याशी बोलणार असून आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत राहू शकणार नसल्याची भूमिका त्यांना सांगणार आहे शिवाय इंडिया आघाडीसोबत राहायचे की नाही याबद्दलचा निर्णय अखिलेश यादव घेतील,’ असंही अबु आझमी यांनी स्पष्ट केलं.