राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या भरघोस यशानंतर आता महायुतीत मुख्यमंत्री (CM) पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप (BJP) सिंगल लार्जेस्ट पार्टी झाल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच व्हावा अशी कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा आहे तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच मुख्यमंत्री करावं यासाठी शिवसेना (Shivsena) आग्रही आहे. यावरच पर्याय म्हणून महायुती एक नवा प्रयोग करण्याच्या विचारात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
काय आहे नवा फॉर्म्युला ?
देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी एका नेत्याला केंद्रात मोठं पद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच फडणवीस हे केंद्रात जाऊन राज्याचं प्रतिनिधित्व करतील तर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरू आहेत. अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रीपद तर त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे. शिवसेनेला आणि राज्यातील मराठा समाजाला नाराज न करण्यासाठी भाजपकडून ही स्ट्रॅटेजी लावली जाणार असल्यास बोललं जात आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री, तर अजित पवार आणि श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करणं सन्मानपूर्वक नाही. कारण शिंदे हे राज्यातील मराठा समाजाचा चेहरा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद दिल्याने मराठा समाज नाराज होऊ शकतो. त्यामुळेच राज्यातील मराठा समाजाला आणि शिवसेनेला खुश करण्यासाठी भाजपने हा आखला असल्याचं बोललं जात आहे. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे सांगणं अवघड असलं तरीही मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी भाजप तडजोड न करता नव्या फॉर्म्युल्याचा अवलंब करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.