एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis), अजित पवार(ajit pawar), दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत राज्याचे नवे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा (CM Eknath Shinde Resigned) सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा अर्थात संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे राज्यातील चौदावी विधानसभा आज विसर्जित झाली.
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती
शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंदे यांना पुढील शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्री होईपर्यंत एकनाथ शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्यास पत्र राज्यपालांनी सुपूर्त केलं आहे.
कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
राजीनामा देण्याच्या काही वेळ आधीच एकनाथ शिंदे यांनी एक प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहीत कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. ‘महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील’, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.