महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या मतमोजणीसाठी आणि निकालासाठी अवघे काही तास बाकी आहेत. मात्र त्याआधीच सत्ता स्थापनेच्या समीकरणांची चर्चा करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांना वेग आला आहे. दोन्हीकडून मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री पदाबाबत असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सूचक विधान केलं आहे.
काय म्हणाले चेन्नीथला ?
‘लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्राची जनता काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीलाच कौल दिला आहे व त्यामुळे त्यांनाच स्पष्ट बहुमत मिळेल. आणि बहुमतासह महाविकास आघाडीत नवं सरकार स्थापन करेल’, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री कुणाचा ?
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला काय ?, असा प्रश्न रमेश चेन्नीथला यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. निकालानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील’, असं रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस आमदार फुटणार नाहीत ?
विधानसभा 2019 च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे, त्याचा थेट फायदा हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीलाच होईल. महाविकास आघाडीला एक्झिट पोल नुसार स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्रिशंकु विधानसभेचा प्रश्न निर्माण होत नाही. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार कठीण परिस्थितीतही पक्षाच्या बरोबर राहिले आहेत, त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज वाटत नाही’, असं स्पष्ट मत चेन्नीथला यांनी व्यक्त केलं आहे.