मुंबई- देशात कोरोना पुन्हा डोकं वर काढायला लागला आहे. दिल्लीसह कर्नाटक, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारने महाराष्ट्र मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मात्र देशात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अनेक राज्यात मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे.
आज मुख्यमंत्र्यांची राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून यामध्ये राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून त्या संबंधीच्या उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे. पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे कोविडची सद्यस्थिती, लसीकरणाची व्याप्ती, विशेषत: बूस्टर ड्राइव्ह आणि काही राज्यांमधील प्रकरणांचा मार्ग यावर सादरीकरण करणार आहेत. या बैठकीनंतर मास्कसक्तीसंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो.