निवडणुकीच्या काळात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आम्ही बंधूंनी एकत्र येऊ नये यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली असल्याचा खुलासा खुद्द राज ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच्या नादी लागून आपण उद्ध्वस्त होऊ, असं राज ठाकरेंना वाटत असेल म्हणूनच त्यांना महाविकास आघाडी बरी वाटत असेल, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
रोहित पवार म्हणाले, ‘राज ठाकरेंना वाटलं असेल की भाजपच्या नादी लागून आपण उध्वस्त होऊ. भाजपने बिहार, हरियाणामध्येही काही पक्षांना उध्वस्त केलं. महाराष्ट्रात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षांच्या विरोधात अपक्ष उमेदवार देऊन त्यांना देखील उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे हे हुशार नेते आहेत त्यामुळेच ही सर्व परिस्थिती पाहून भाजपपेक्षा महाविकासआघाडी बरी, असं त्यांना वाटत असेल. त्यांचे आधीपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे भावासोबत जाणं आणि भाजपच्या विरोधात ताकदीनं लढणं हे त्यांना उचित वाटत असेल. मात्र त्यांनी फक्त एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत, अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.’
राज ठाकरेंना मतं खाण्याची सुपारी
रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका देखील केली. ‘राज ठाकरे यांना भाजपनं मतं खाण्याची सुपारी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारची मतं खाऊन भाजपला मदत करायची असं दिसून येत आहे. हे लोकांना देखील कळून चुकलं आहे. राज ठाकरे यांची राजकारणात जी उंची होती ती भाजपने कमी केली’, या शब्दात रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.