एकेकाळी शरद पवारांचे कट्टर समर्थक असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून अनेक मोठमोठ्या पदांवर कामगिरी केलेल्या दिलीप वळसे पाटलांना पराभूत करण्याचं आवाहन खुद्द शरद पवार यांनीच उमेदवारांना केलं आहे. आंबेगावात घेतलेल्या सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘आंबेगाव तालुक्याचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. इथल्या जनतेनं मला नेहमीच साथ दिली. स्व दत्तात्रेय वळसे पाटील कायम माझ्या पाठीशी राहिले. त्यांच्या लेकानेही माझ्यासोबत काम करावे, असे त्यांना वाटायचं. आणि त्यांच्या लेखकालाही माझ्यासोबत काम करायची इच्छा होती. त्यामुळेच मी दिलीप वळसे पाटलांची निवड केली. त्यांनी माझ्याकडून सगळी कामं शिकून घेतली. त्यांना मी विधानसभेसाठी संधी दिली, आमदार केलं, मंत्रीही केलं. मात्र सगळं देऊनही त्या माणसाने माझी साथ सोडली’, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना शरद पवार असेही म्हणाले की, ‘ज्यांना आम्ही सगळं दिलं, त्यांनीच आमची साथ सोडली. हे लोकांना आवडले नाही. ते आताही सांगतात की आम्ही पवार साहेबांना मानतो पण त्यात काही तथ्य नाही. विचारांशी गद्दारी करणाऱ्याला माफी त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा, पराभूत करा.’ भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी दोनदा दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा असं आवाहन आंबेगावकरांना केलं. त्यामुळे आवाहनाचा फायदा देवदत्त निकम यांना होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.