राज्यात विधानसभेचे पडघम वाजल्यापासून प्रत्येकच पक्षात आउटगोइंग आणि इन्कमिंग पाहायला मिळत आहे. अशाच एका इन्कमिंगचा सुखद धक्का शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बसला असून मनसेला मात्र ऐन निवडणुकीच्या काळात चांगलाच फटका बसला आहे.
मनसेचे वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर या प्रवेशानंतर त्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप करत वरूण सरदेसाई यांना निवडून आणणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. ज्यामुळे वांद्रे पूर्व निवडणुकीत ठाकरे गटाला याचा जोरदार फायदा होऊ शकतो.
राज ठाकरेंवर गंभीर आरोप
अखिल चित्रे यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, ’18 वर्षे मी मनसेमध्ये काम केलं. मात्र जो तेव्हा विचारांसाठी स्थापन करण्यात आला होता तेच विचार आता बाजूला ठेवून पक्ष चालू असल्याने मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे स्वतःचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नाही तर दुसऱ्याचा उमेदवार पाडण्यासाठी निवडणूक लढवत आहे. अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते, मी दुसऱ्याचं लेकरं माझ्या अंगाखांद्यावर खेळवणार नाही. मग तरीदेखील तीन-चार पक्ष बदलून आलेल्या तृप्ती सावंत यांना एका रात्रीत उमेदवारी देण्यात आली. फक्त दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी… वांद्रे पूर्व मधून ठाकरे गटाचे उमेदवार वरूण सरदेसाई यांना पाडण्यासाठी मनसेचे उमेदवार तृप्ती सावंत या माहितीचे उमेदवार झिशान सिद्दिकी यांच्यासोबत बैठका घेत आहेत’, असं थेट आरोप त्यांनी मनसेवर केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘तृप्ती सावंत स्वतःला जिंकवण्यासाठी लढत असत्या तर मी त्यांच्यासोबत असलो असतो. मात्र केवळ दुसऱ्या पक्षाचे उमेदवाराला पाडण्यासाठी निवडणूक लढवत असाल तर ती योग्य नाही. त्या पक्षाला ज्यांना पाडायचं होतं त्यांना मी पाडू देणार नाही, ही आता माझी जबाबदारी आहे. वरुण सरदेसाई यांना जिंकून आणायची जबाबदारी आता माझी आहे.’ अशाप्रकारे चित्रे यांनी सरदेसाई यांच्या विजयाची मशाल स्वतःच्या हाती घेतली आहे. ज्याचा फटका मनसेला बसण्याचे तीव्र शक्यता आहे.