विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात दहा हजार पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज हे 288 जागांसाठी भरण्यात आले होते. यापैकीच उमेदवारांना आपले अर्ज माघारी घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी चार नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती. अनेक मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील नाराजांनी बंडखोरी केली असल्याने त्यांची बंड शमवण्याचे प्रयत्न पक्षातील वरिष्ठांकडून सुरू आहेत. असंच एक बंड थंड करण्यात भाजपला यश आलं आहे.
मुंबईत भाजपचे बंडखोर उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गोपाळ शेट्टी यांच्या बंडखोरीमुळे भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांना आणि महायुतीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता असल्याने पक्षाकडून शेट्टी यांचं बंड शमवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी शेट्टी यांची त्यांच्याच निवासस्थानी भेट घेतल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
माघार का ?
शेट्टी यांनी निवडणूक अर्ज मागे घेत असल्याचं जाहीर करताना माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘गोपाळ शेट्टी करतोय तर करु द्या, काय फरक पडतो, असं आमच्या पक्षात नाही. आमच्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेते मला भेटायला आले होते. माझं म्हणणं मी त्यांच्यापुढे मांडलं. बाहेरचा उमेदवार आणू नये, असं मी म्हणत नाही. मात्र हे सातत्याने झाल्याने मला हे करावं लागलं, मात्र आता मी माघार घेत आहे. मात्र मला तसं करायचं नव्हतं. माझी ही लढाई विशिष्ट कार्यपद्धतीसाठी होती’, असं स्पष्टीकरण गोपाळ शेट्टी यांनी दिलं आहे.