दुर्गम भागातील भुईणी गावातील बांधवांबरोबर साजरी केली सेवा-भारतीच्या कार्यकर्त्यांनी यंदाची दिवाळी

904 0

दिवाळी म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा उत्सव.सर्वांसाठीच आनंद घेऊन येणारा.पण काही लोक ह्या आनंदापासून नेहमीच वंचित राहतात.त्यातूनही कष्ट करून जे दोन पैसे मिळतात ते दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पण पुरेसे पडत नाहीत.हीच व्यथा आहे मुळशी तालुक्यातील भुईणी येथील आपल्या बांधवांची.

सेवा भारती पश्चिम प्रांत च्या छत्रपती संभाजी भागाच्या कार्यकर्त्यांनी ठरविल्याप्रमाणे मागील वर्षाप्रमाणे यंदाची दिवाळी भुईणी ह्या दुर्गम भागातील गावाच्या
ग्रामस्थांबरोबर साजरी केली.

ह्या गावातील नागरिकांना आवश्यक लागणाऱ्या दैनंदिन वस्तू बरोबरच कपडे, टॉवेल,धान्य,शेतीची अवजारे,धान्य कोठी,पाण्याची पिशवी,टॉर्च,कपड्यांचा साबण,छत्री,ताडपत्री,नेलकटर, तसेच विविध जीवनावश्यक वस्तू,किराणा,दिवाळी फराळ,आकाशकंदील,पणत्या,
रांगोळी,सुगंधी उटणे,टूथ पेस्ट, तसेच छोट्या मुलांसाठी खेळणी,मिठाई अश्या आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. भुईणी गावातील ४० कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त हे साहित्य, भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.
दिवाळी साहित्य भेटीने भूईणी चे ग्रामस्थ गहिवरले. तुमच्याबरोबर साजरी केलेली अशी दिवाळी यापूर्वी कधीच अनुभवली नाही.अशी भावुक प्रतिक्रिया येथील ज्येष्ठांनी व्यक्त केली.

ह्या पूर्वी गावात रिचार्ज पिट,बोअरवेल पाणी तपासणीचे काम,शैक्षणिक मदत पण सेवा भारती तर्फे केले असून विविध वाड्या वस्त्यांना भेटी देऊन या गावातील प्रश्नांचा अभ्यास केला गेला आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहामध्ये झालेल्या ह्या कार्यक्रमाच्या सुरवातीस भूईणी चे सरपंच राजेंद्र दबडे,सचिन दबडे,उपसरपंच विशाल झोरे यांचे सेवा भारती तर्फे स्वागत करण्यात आले.सेवा भारती पदाधिकारी ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

सेवा भारतीचे संभाजी भागाचे सचिव संदीप गुजर यांनी प्रास्ताविक केले व उपस्थितांचे स्वागत केले.नवनाथ भूतकर यांच्या पुढाकाराने एकत्रित सत्संग करण्यात आला.डॉ अंजली चांदवले ह्यांनी सेवा भारती तर्फे आरोग्य आयाम अंतर्गत राबवित असलेल्या सुपोषित भारत अभियान विषयी ग्रामस्थांना सविस्तर माहिती दिली.

एरंडवणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीकांत पुराणिक यांनी सर्व गावकऱ्यांना शंभर टक्के जागृतपणे मतदान करण्याचे आवाहन केले.भुईणी ग्रामस्थांच्या वतीने धाकलू झोरे यांनी सेवा भारती संस्थेचे व जन कल्याण समितीचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच राजेंद्र दबडे,सचिन दबडे,विशाल झोरे,लक्ष्मण सांबरे,बाळासाहेब मरगळे,सुनिता मरगळे,संगीता मरगळे,अलका झोरे,राहुल राठोड,स्वाती शेडगे,अंकुश झोरे,धोंडीबा झोरे,सुरेश झोरे, भागाबाई झोरे व सेवा भारती चे कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!