Manoj Jarange

संपादकीय लेख! मराठवाडा कुणाचा? ‘जरांगे फॅक्टर’ ठरवणार!

94 0

‘जो मराठवाडा जिंकेल तो महाराष्ट्रावर राज्य करेल,’ असं म्हटलं जातं पण मराठवाडा ‘सर’ करणं वाटतं तितकं सोपं नाही. इथलं जाती-पातीचं राजकारण, नात्या-नात्यांमधल्या लढाया, दुष्काळ, नापिकीमुळं वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, उद्योगधंद्यांची वानवा आणि त्यातून वाढत जाणारी बेरोजगारी आदी विविध समस्यांविषयी आवाज उठवणाऱ्या पक्षाला मराठवाडा कायम साथ देत आलाय शिवाय हिंदुत्वाच्या विचारधारेवर चालणाऱ्या पक्षांना मराठवाड्यानं नेहमीच हात दिलाय. शिवसेना मराठवाड्यात रुजली ती तिच्या हिंदुत्वाच्या विचारधारेमुळंच! त्या खालोखाल भाजपलाही मराठवाड्यानं कित्येकदा तारलंय! मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आणि 46 विधानसभा मतदारसंघ येतात. चला तर मग मराठवाड्यात फेरफटका मारून येऊ… 2019 च्या निवडणुकीत इथं कुणी बाजी मारली? इथली सध्याची राजकीय गणितं काय? आणि 2024 मध्ये मराठवाडा कुणाला साथ देणार? पाहूयात, मराठवाड्यात कोण सरस? ‘जरांगे फॅक्टर’ किती चालणार? मराठवाडा यंदा कुणाला तारणार?

2019 चा विधानसभा निवडणूक निकाल पाहिला तर युतीनं 46 पैकी 28 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या 16 तर शिवसेनेच्या 12 जागा निवडून आल्या होत्या. आघाडीनं 16 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 08 जागा निवडून आल्या होत्या. महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा 01, तर 01 अपक्ष उमेदवार आमदार बनला होता. 2014 च्या तुलनेत भाजप आणि काँग्रेसची प्रत्येकी 01जागा वाढली तर राष्ट्रवादीच्या जागा मात्र होत्या तितक्याच टिकून राहिल्या; ना वाढल्या ना घटल्या. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना व एकनाथ शिंदेंची शिवसेना असे दोन गट निर्माण झाले. शिवसेनेच्या 12 आमदारांपैकी 09 आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि शरद पवारांची राष्ट्रवादी व अजित पवारांची राष्ट्रवादी असे दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादीच्या 08 आमदारांपैकी 06 आमदार अजित पवार गटात सामील झाले.

आता आपण मराठवाड्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाची ताकद किती हे पाहू आणि प्रत्येक पक्षाचे स्ट्रॉंग पॉईंट्स व विक पॉइंट्स मांडण्याचा प्रयत्न करू… सुरुवातीला भाजपची राजकीय ताकद किती हे समजावून घेऊ…
भाजपनं 2014 मध्ये राज्यात 122 जागा जिंकून स्वबळावर सत्ता स्थापन केली. त्यात मराठवाड्यातील 15 जागांचा समावेश होता. 2019 मध्ये भाजपची आणखी एक जागा वाढली तर शिवसेनेला मिळालेल्या 12 जागा धरता युतीला मराठवाड्यातील 46 जागांपैकी 28 जागा मिळाल्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपची पिछेहाट झाली. 2019 मध्ये मराठवाड्यातल्या 08 पैकी 04 जागा मिळवणाऱ्या भाजपला 2024 मध्ये खातंही खोलता आलं नाही. शिवसेना शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांच्या रूपानं छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा युतीच्या पारड्यात पडली हीच काय ती जमेची बाजू! लोकसभेला भाजपचा दारुण पराभव होण्याचं कारण ठरलं मराठवाड्यात चाललेला ‘जरांगे फॅक्टर!’ नाही नाही म्हणत सरतेशेवटी मराठवाड्यात ‘जरांगे फॅक्टर’ चालला हे भाजपलाही मान्य करावं लागलंच. जरांगे पाटलांचं उपोषण जसजसं तीव्र होत गेलं तसतसं मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा समाजानं उचलून धरला. जरांगेंचं आंदोलन केवळ तरुणांनीच नव्हे तर मराठा समाजातील बहुतांश लोकांनी उचलून धरलं. अखेर जरांगेंच्या आंदोलनाची धार बोथट करण्यात सरकार कमी पडलं आणि याच परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला सामोरं जावं लागलं. सरसकट मराठा आरक्षण आणि ‘सगेसोयरे’ या शब्दाची अंमलबजावणी न झाल्यानं जरांगे पाटलांनी सभा, रॅलींच्या माध्यमातून आपल्या आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आणि भाजपविरोधात मराठवाड्यात असंतोषाची लाट पसरली. शेवटी या गोष्टीचा परिणाम निवडणूक निकालावर झाला आणि मराठवाड्यात लढलेल्या 04 ही जागा भाजपला गमवाव्या लागल्या. याच मराठवाड्यात 2019 च्या निवडणुकीत औरंगाबादचा मतदारसंघ वगळता सातही मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार निवडून आले होते. बीडमधून भाजपच्या प्रीतम मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, लातूरमधून सुधाकर शृंगारे, तर तेव्हाचे उस्मानाबाद म्हणजेच आताच्या धाराशिवमधून शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर, हिंगोलीतून हेमंत पाटील, परभणीतून बंडू जाधव निवडून आले होते. औरंगाबाद म्हणजेच आताच्या संभाजीनगरमधून मात्र वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर MIM चे इम्तियाज जलील निवडून आले होते. 2019 च्या परफॉर्मन्स पाहाता आपल्याला 2024 च्या निवडणुकीत मराठवाड्यातली जनता पुन्हा एकदा साथ देईल, असं महायुतीला वाटलं होतं पण युतीचा भ्रमनिरास झाला आणि जी जागा 2019 मध्ये हातून निसटली होती ती संभाजीनगरची एकमेव जागा महायुतीच्या वाट्याला आली. अर्थात, ही जागा शिवसेना शिंदे गटाची होती; भाजपच्या हाती मात्र 04 जागा लढूनही भोपळाच लागला. 2019 मध्ये मिळवलेल्या बीड, जालना, लातूर, नांदेड या 04 ही जागा हातून निसटल्या. शिवसेना शिंदे गटाची हिंगोलीची जागाही गेली. आता हे सारं का घडलं तर जरांगे फॅक्टरमुळं! “मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला निवडणुकीत असं पाडा की, त्याच्या पुढच्या पिढ्यांनी निवडणूक लढवण्याचा विचारही केला नाही पाहिजे,’ हे जरांगेंचं विधान मराठा समाजातील लोकांनी उचलून धरलं. जरांगेंनी हे विधान करताना कुणाचं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोष कुणाकडं आहे याचा अंदाज मराठा मतदारांनी लावला आणि परभणी, बीड, धाराशिवसह इतरही मतदारसंघांमध्येही ‘जरांगे फॅक्टर’ चालला. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळं एकवटलेला मराठा समाज, भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदललं जाण्याचा जनतेत पसरलेला नरेटिव्ह आणि मग त्यातूनच दलित आणि मुस्लिम समाजात युतीविरुद्ध निर्माण झालेली नाराजी या सर्व गोष्टी युतीला बॅकफूटवर घेऊन गेल्या. या व्यतिरिक्त शेतमालाला विशेषतः सोयाबीनला न मिळालेला समाधानकारक हमीभाव हा मुद्दा देखील युतीच्या चांगलाच अंगलट आला. या गोष्टींमुळं भाजपला मराठवाड्यातून ऑक आऊट करावं लागलंच पण ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना पक्षात प्रवेश देणं हे देखील भाजपला भोवलं. नांदेडची प्रतापराव चिखलीकरांची सीट गेली ती यामुळंच! आता मात्र भाजपला मराठवाड्यात लोकसभेला झालेलं नुकसान विधानसभेला भरून काढायचं असेल तर ‘जरांगे फॅक्टर’ हाताळण्यासह शेतकऱ्यांची नाराजी कशी दूर करता येईल याचंही आव्हान पेलावं लागेल.

आता काँग्रेसकडं वळू…तसं पाहिलं तर काँग्रेसला मराठवाड्यानं बऱ्यापैकी साथ दिलीये. 2009 च्या निवडणुकीत 18 जागा जिंकून काँग्रेस मराठवाड्यात नंबर एकचा पक्ष बनला होता. 1999 च्या निवडणुकीतही काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या.
2014 आणि 2019 मधील मोदी लाटेमुळं मात्र काँग्रेस मराठवाड्यात बॅकफूटवर गेली. 2014 मध्ये 09 तर 2019 मध्ये केवळ 08 जागा हाती लागल्या. मराठवाड्यातील संभाजीनगर आणि नांदेड हे दोन जिल्ह्यांत सर्वांत जास्त म्हणजे प्रत्येकी 09 मतदारसंघ येतात. नांदेड जिल्हा तर काँग्रेसचा बालेकिल्ला! याच नांदेडमधून काँग्रेसनं महाराष्ट्राला शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे पिता-पुत्र मुख्यमंत्री म्हणून दिले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील 09 जागांपैकी 04 जागा एकट्या काँग्रेसनं जिंकल्या. मात्र, त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नांदेडची जागा गमवावी लागली. भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी 2019 च्या लोकसभेला अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे 2014 च्या मोदी लाटेत संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेले काँग्रेसचे दोन्ही खासदार याच मराठवाड्यानं जिंकून दिले होते. हिंगोलीतून राजीव सातव आणि नांदेडमधून अशोक चव्हाण. पुढं 2024 च्या ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हेच अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. मात्र, अशोक चव्हाण भाजपमध्ये जाऊनही काँग्रेसनं लोकसभेला नांदेडची जागा आपल्याकडं राखली. वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांचा पराभव केला. वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यानं आता नांदेड लोकसभेची जागा रिक्त आहे. शिवाय अशोक चव्हाण भाजपचे राज्यसभा खासदार झाल्यानं भोकर विधानसभेची जागाही रिक्त आहे. दुसरीकडं याच नांदेड जिह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले आहेत. पण, असं असलं तरी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला काँग्रेस 14 जागा मिळवून महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष बनलाय. नाही म्हटलं तरी मराठवाड्यात भाजपविरोधात चाललेल्या ‘जरांगे फॅक्टर’चा काँग्रेसला थोड्या फार प्रमाणात फायदा झाला. आजही मराठवाड्यात मराठा आंदोलनाची आग धगधगती आहे. त्यामुळं येत्या विधानसभेला जर पुन्हा एकदा ‘जरांगे इफेक्ट’ पाहायला मिळालाच आणि काँग्रेसची माणसं भाजपनं फोडली हा नरेटिव्ह चाललाच तर काँग्रेस पक्ष मराठवाड्यात कमबॅक करू शकतो.

आता पुढला पक्ष म्हणजे शिवसेना! शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं हिंदुत्व याची छाप मराठवाड्यावर कायम राहिलीये. 2009 च्या विधानसभेचा अपवाद वगळता मराठवाड्यानं शिवसेनेला ‘डबल डिजिट’ आमदार दिले आहेत. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 16 उमेदवार आमदार बनले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यानं शिवसेनेला 12 आमदार दिले. त्यात एकट्या संभाजीनगरच्या 06 आमदारांचा समावेश होता. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली तरीही या ना त्या शिवसेनेचा भगवा मराठवाड्यात फडकतोच आहे. आता यातले 03 आमदार ठाकरे गटात तर 09 आमदार शिंदे गटात आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचा 01 तर ठाकरे गटाचे 03 खासदार निवडून आले. थोडक्यात, आजही मराठवाड्यात दोन्ही शिवसेनेचे मिळून 12 आमदार आणि 04 खासदार आहेत. आता मात्र दोन्ही शिवसेना वेगळ्या होऊन वेगवेगळ्या युती-आघाडीचा घटक बनल्या आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याची जनता कोणत्या शिवसेनेला साथ देणार? युतीकडच्या की आघाडीकडच्या? अर्थात, याचं उत्तर या निवडणुकीत नक्की मिळणार!

आता राष्ट्रवादीकडं वळूयात… मराठवाड्यातील जनतेनं राष्ट्रवादीला थोड्याफार प्रमाणात का होईना पण वेळोवेळी साथ दिलीये. 2009 नंतर तब्बल 15 वर्षांनी म्हणजेच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 01 उमेदवार मराठवाड्यातून खासदार झाला. बीडचे बजरंग सोनवणे! सोनवणे आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढाईत सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा 6,553 मतांनी पराभव केला. बीड जागा जिंकून आणण्यात साहेबांच्या राष्ट्रवादीला ‘जरांगे फॅक्टर’ची मदत झाली. मराठा-ओबीसी संघर्षातून निर्माण झालेली राजकीय समीकरणं राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. 1999 मध्ये झालेल्या पक्ष स्थापनेनंतर 2004 मध्ये 01 तर 2009 मध्ये 02 उमेदवार मराठवाड्यातून खासदार झाले. विधानसभेलाही राष्ट्रवादीला बऱ्यापैकी यश मिळालंय. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 12 जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या होत्या. 2019 मध्ये राष्ट्रवादीला 08 जागा मिळाल्या. आता पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटात 06 तर शरद पवार गटात 02 आमदार आहेत. मराठवाड्यात पुन्हा एकदा जातीय समीकरणं चालली तर त्याचा राजकीय फायदा साहेबांच्या राष्ट्रवादीला होऊ शकतो. लोकसभेला 10 पैकी 08 जागा जिंकल्यानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साहेबांच्या राष्ट्रवादीत इन्कमिंग वाढलं आहे. मराठवाड्यातील आजी-माजी आणि इच्छुक उमेदवार तुतारी फुंकायला रांगेत उभे आहेत. त्यामुळं साहेबांच्या राष्ट्रवादीला मराठवाड्यात आपल्या पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवण्याची आयती संधी चालून आलीये. आता राहाता राहिला प्रश्न अजितदादांच्या राष्ट्रवादीचा… अजितदादांकडं जरी मराठवाड्यातील 06 विद्यमान आमदार असले तरी 2024 च्या लोकसभेत अजितदादांना धाराशिवची जागा गमवावी लागलीये. शिवाय पक्षाच्या कोट्यातून परभणीतून लढलेले राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांनाही पराभव स्वीकारावा लागलाय. साहेबांची साथ सोडून भाजपसोबत गेलेल्या अजितदादांवर महाराष्ट्राची जनता नाराज असल्याचं चित्र लोकसभेला पाहायला मिळालं. 04 पैकी केवळ 01 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जिंकता आली. लोकसभेला नाकारलेल्या अजितदादांना मराठवाड्याची जनता विधानसभेला स्वीकारणार का? ‘लाडका भाऊ’ म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहाणार का? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

आता मराठवाड्यात सर्वांत मोठा ‘गेम चेंजर’ ठरू शकणाऱ्या मुद्याला हात घालू… मराठा आरक्षणाचा मुद्दा! नारायणगडावर मराठा समाजाची लाखोंच्या घरात गर्दी जमवून दसरा मेळावा घेतलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या भाषणानं सर्वांच्या उरात धडकी भरवलीये. ‘आचारसंहिता लागण्यापूर्वी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर तुम्हाला उलथवून टाकू,’ असा इशाराच त्यांनी दिलाय. येत्या विधानसभा निवडणुकीत जरांगे उमेदवार उभे करणार की पाडणार एवढाच काय तो निर्णय व्हायचा बाकी आहे. उद्या जर का जरांगे राजकीय मैदानात उतरलेच तर मराठवाड्यासह महाराष्ट्राचा निकालही वेगळा लागू शकतो.

एकूणच काय तर उद्या महाराष्ट्रावर कोण राज्य करणार हे मराठवाडा ठरवणार एवढं मात्र नक्की! पुढल्या भागात पश्चिम महाराष्ट्रात जाऊ आणि तिथं कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे सविस्तर पाहू…

संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!