1978 Assembly Election : आधी इंदिरा-रेड्डी काँग्रेसचं सरकार मग बनलं ‘पुलोद’ सरकार!

173 0

एक अशी निवडणूक, जिच्या निकालानंतर दोन सरकारं अस्तित्वात आली आणि महाराष्ट्रानं देखील दोन मुख्यमंत्री बघितले. कोणती होती ही निवडणूक? सांगतो… ती होती 1978 ची विधानसभा निवडणूक!चला तर मग आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहूयात… ‘विधानसभा फास्ट फॉरवर्ड’ या विशेष मालिकेचा चौथा भाग… किस्सा 78 चा!

महाराष्ट्रात 1978 मध्ये विधानसभा निवडणूक लागली आणि काँग्रेसची दोन शकलं झालेल्या म्हणजेच इंदिरा काँग्रेससह रेड्डी काँग्रेसलाही फटका बसला. पहिल्यांदाच 288 जागा, काय लागला निकाल? कुणाचं आलं सरकार? आणीबाणीनंतरच्या विरोधामुळं इंदिरा गांधींचं नेतृत्व स्वीकारण्यावरून काँग्रेस पक्षात फूट पडली. ‘इंदिरा गांधीनिष्ठ’ आणि ‘काँग्रेस पक्षनिष्ठ’ असे दोन गट पडले. देशपातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व झुगारून ‘रेड्डी काँग्रेस’ची स्थापना केली. महाराष्ट्रातही याचं प्रतिबिंब उमटलं. काँग्रेसचे दोन गट झाले. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार आदी नेते यांची रेड्डी काँग्रेस तर नासिकराव तुरपुडे आदी नेत्यांची इंदिरा काँग्रेस या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढल्या तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन झालेला जनता पक्ष पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरला. रेड्डी काँग्रेसनं रिपब्लिकन गवई गटासोबत तर इंदिरा काँग्रेसनं शिवसेनेशी युती केली. जनता पक्षानं शेकाप, माकप, रिपाइं (कांबळे गट), नाग विदर्भ समिती आणि मुस्लिम लीग (बंडखोर गट) यांच्याशी हातमिळवणी केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 288 जागांसाठी निवडणूक लागली. 12 पक्ष आणि 894 अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले आणि मग सुरू झाला विधानसभा 1978 चा रणसंग्राम…

आणीबाणीचा फटका जसा इंदिरा काँग्रेसला बसला तसाच तो रेड्डी काँग्रेसलाही बसला. परिणामी, महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 99 जागा जिंकून जनता पक्ष नंबर एकचा पक्ष ठरला. इंदिरा काँग्रेसला 62, रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. या निवडणुकीत 09 पक्षांना जागा जिंकता आल्या तर उर्वरित 03 पक्षांना भोपळाही फोडता आला नाही. या 03 पक्षांमध्ये शिवसेनेचाही समावेश होता. 894 पैकी 28 अपक्ष निवडून आले.
1972 च्या तुलनेत अपक्ष आमदारांची संख्या 05 नं वाढली. कोणत्याही एका पक्षाला बहुमत नं मिळाल्यानं राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. या निवडणुकीत जनता पक्ष नंबर एकचा पक्ष ठरला खरा पण निवडणुकीपूर्वी स्वतंत्र लढलेल्या दोन्ही काँग्रेस निवडणुकीनंतर एकत्र आल्या आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळं ‘पक्ष सर्वांत मोठा पण सरकार स्थापनेचा मिळाला नाही मोका,’ असं काहीसं जनता पक्षाचं झालं.

सत्तेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आले आणि रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात प्रथमच संयुक्त सरकार स्थापन झालं. 7 मार्च 1978 रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तर इंदिरा काँग्रेसच्या नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार उद्योगमंत्री बनले. पुढं तिरपुडे आणि रेड्डी काँग्रेस गटातला कलह सरकार पडण्यास कारणीभूत ठरला. 1978 च्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार 40 आमदारांना सोबत घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडले. सरकार अल्पमतात आल्यानं वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडेंनी राजीनामा दिला.
परिणामी, महाराष्ट्रातील पहिलं आघाडी सरकार अवघ्या साडेचार महिन्यांतच कोसळलं. पुढं शरद पवारांनी ‘समाजवादी काँग्रेस’ची स्थापना केली आणि जनता पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी युती करून पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच (पुलोद) ची सत्ता आणली. 18 जुलै 1978 रोजी शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात प्रथमच बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आलं. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी शरद पवार यांनी राज्याचं नेतृत्व स्वीकारल्यानं सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांची नोंद झाली जो विक्रम आजही अबाधित आहे

एकूणच काय तर 1978 च्या निवडणुकीनंतर काय घडलं तर जनता पक्षाला सत्तेपासून दूर राहावं लागलं, दोन्ही काँग्रेस एकत्र येऊनही आघाडी सरकार कोसळलं आणि शरद पवारांचं ‘पुलोद’ सरकार सत्तेत आलं.

संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

 

 

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!