पुण्यात दांडिया पाहण्यासाठी आलेल्या शहापूरच्या तरुणावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित चोरगे, अक्षय सावंत, अभी सावंत, अजय रांजणे, प्रसाद रांजणे व त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन दिलीप मोरे (वय १९, रा. आत्मा मालिक विर्श्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, मोहिली, अघाई, शहापूर) असं जखमी युवकाचं नाव असून त्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमका प्रकरण काय ?
अर्जुन हा गावच्या यात्रेला जाण्यासाठी शहापूरहुन पुण्यात मामाकडे आला होता. त्यावेळी मामाचा मुलगा राज कदम याच्याबरोबर दुचाकीवरुन तो पुण्यातील अय्यप्पा स्वामी मंदिरासमोर सुरू असलेल्या दांडिया पाहण्यासाठी गेला. तेथे काही वेळात मोटार सायकलवरुन सात-आठ मुलं आली. त्यांनी कोयत्यासह आणखी काही धारदार शस्त्र हवेत फिरवून आरडा ओरडा सुरू केला. दांडिया खेळायला आलेल्या लोकांना शिवीगाळ करत दहशत माजवू लागले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्वजण घाबरून पळू लागले. अर्जुन आणि राज देखील पळत होते मात्र त्याचवेळी टोळक्यातील एकाने राजवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्याने तो वार चुकवला मात्र तरीही त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर राज तिथून जोरात पळून गेला.
फिर्यादी अर्जुन हा देखील पळत असताना ठेच लागल्याने तो खाली पडला. तेवढ्यात टोळक्याने डाव साधला. सगळ्यांनी राजवर वार केले. त्याच्या डोक्यात, कानावर, पाठीवर हातांवर वार करून त्याला जखमी केले. त्यावेळी तो मदतीची याचना करत होता. हे सगळं पाहून दूरवरून एक महिला पोलीस अधिकारी धावत आल्या. ते पाहताच सर्वजण पळून गेले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फिर्यादीला दवाखान्यात दाखल करण्यात आलं व लागलीच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.