SC, ST आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा; गुणरत्न सदावर्ते देणार आव्हान ?
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला. एससी, एसटी आरक्षणाच्या प्रवर्गातील अधिक मागास जातींसाठी उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले. या निर्णयाचे अनेक स्तरातून स्वागत झाले आहे मात्र आता या निकालाला ॲड. गुणरत्न सदावर्ते हे आव्हान देणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणालेत की, ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा असून हा निकाल राज्यांतील आगामी निवडणूकांवर प्रभाव टाकणारा आहे. अशा प्रकारचा कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला असून न्यायालय त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे आरक्षणाबाबतचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार आहे.’
कोर्ट काय म्हणाले ?
सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान प्रत्येक राज्याला एससी, एसटी प्रवर्गात उपवर्गीकरण करुन आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 2004 साली सर्वोच्च न्यायालयानेच राज्यांना एससी आणि एसटी प्रवर्गात वर्गवारी करण्याचा अधिकार नाकारला होता. मात्र, गुरुवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच जुन्या निर्णयाची समीक्षा करत हा नवा निर्णय दिला. सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सहा विरुद्ध एक अशा मताने राज्यांना एससी आणि एसटी प्रवर्गात उपवर्गीकरण करण्याच्या अधिकाराला मंजुरी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अधिक मागास आणि वंचित घटकांना फायदा होईल, असे मानले जात आहे. मात्र याच निर्णयाच्या विरोधात आता सदावर्ते आव्हान देणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.