उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते पोहोचले असून त्यांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मातोश्री बाहेर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र तरीही आंदोलकांनी मातोश्री बाहेर गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र यावरच आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘राज्यात कुठेच मराठा आंदोलन सुरु नाहीये. मातोश्रीवर कोण गेलंय हे माहीत नाही. मात्र कदाचित हे दरेकरांचं अभियान असेल. मराठ्यांना मुंबईत जाऊन सरकारला जाब विचारण्याचा अधिकार आहे. ते विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकतात. मातोश्रीवर गेलेल्या आंदोलकांनी मराठा समाजाच्या बाजूने उभे राहावे, अशी माझी विनंती आहे. त्यांनी दरेकर यांच्या बाजूने उभे राहू नये. हा दरेकर बुडबुडा काही कामाचा नाही. ते आपल्यासाठी महत्त्वाचे नाही. त्यामुळं मातोश्रीवर जाब विचारायला गेलेल्यांनी सावध राहावे.’