राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातही दोन-तीन दिवसांपासून पुण्यात सलग मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच पुणे शहराचे मुख्य धरण असलेले खडकवासला धरण 100% भरल्यामुळे धरणातून कालपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीपात्रांमधील गावे, वस्त्या, सोसायट्या आणि रस्त्यांवर पाणी शिरले आहे. पुण्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यात येतच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘सगळ्या धरणांमधून कॅनॉलमध्ये विसर्ग करायला सांगितलं आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागात लष्कराचे चव्हाण तैनात करण्यात आले आहेत. एन डी आर एफ चे 40 जवान त्या ठिकाणी मदत कार्यासाठी तैनात आहेत. मुळशी धरणही भरले आहे. पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनाही अलर्ट राहायला सांगितलं आहे. ज्या सोसायटीच्या टाक्यांमध्ये पाणी शिरलं आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकर द्वारे केला जाईल. जिथे लोक अडकले असतील त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांचंही पूरस्थितीवर संपूर्ण लक्ष आहे.’
याबरोबरच पालकमंत्री अजित पवार यांनी दोन दिवस धबधबे आणि पाण्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी न जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच जीवित हानी झालेल्या आणि जखमी नागरिकांना मदत केली जाईल, असे आश्वासन देखील दिले आहे.