महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार का ? केंद्राचे महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र

217 0

नवी दिल्ली- कोरोनाने काही राज्यांमध्ये पुन्हा डोके वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. महाराष्ट्रासह केंद्रानं पाच राज्यांना पत्र लिहून पंचसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मास्कची सक्ती केली जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग चिंता करायला लावणारा आहे. तसंच संसर्ग वाढण्याचं प्रमाणही चिंताजनक आहे. मंगळवारी 24 तासात 632 नवे कोरोना रुग्ण दिल्लीत आढळून आले आहे. तर सोमवारी 501 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे दिल्लीत 26 टक्क्यांनी रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

मागील काही दिवसांत दिल्लीत कोरोना रुग्णवाढ तिप्पट प्रमाणात होत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. मात्र कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाल्याची नोंद दिल्लीत मंगळवारी करण्यात आलेली नाही. ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. दिल्लीत 414 रुग्ण बरे झाल्याचंही मंगळवारी दिल्लीच्या आरोग्य प्रशासनकडून सांगण्यात आलं आहे .

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मंगळवारी ( 19 एप्रिल ) 127 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 7,876,041 इतकी झाली आहे. तीन दिवसांनंतर राज्यात कोरोनामुळे मंगळवारी तीन रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोना बळींची संख्या ही 1,47,830 इतकी झाली आहे .

सोमवारी ( 18 एप्रिल ) रोजी राज्यात 59 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 16 एप्रिलला 98 आणि 17 एप्रिलला 127 नव्या रुग्णांचं निदान झालं होतं . मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 108 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईत मंगळवारी 85 नव्या रुग्णांची भर पडली आहे . तर सोमवारी 34 रुग्ण वाढले होते . दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे मुंबईत एकाही रुग्णाचा बळी गेला नव्हता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!