पुणे- सन २०२०-२१ मध्ये अभय योजनेचा फायदा घेऊन मालमत्ता करात दंडमाफी मिळवलेल्या दीड लाख थकबाकीदार मालमत्ताधारकांपैकी ४५ हजार ७४५ मालमत्ताधारक सन २०२१-२२ मध्ये पुन्हा थकबाकीदार झाले आहेत. अशा मालमत्ताधारकांना दिलेली दंडमाफि रद्द करण्यात यावी अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. या बाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.
या पत्रात वेलणकर यांनी म्हटले आहे की, २०२०-२१ या वर्षी पुणे महापालिकेने थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी अभय योजना आणली होती, ज्यात थकबाकीदारांचा ७५% दंड माफ करण्यात आला. या योजनेचा लाभ घेऊन २०२०-२१ वर्षी १ लाख ४९ हजार ७०० थकबाकीदार मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराची थकबाकी भरली. आता या सर्व मालमत्ता धारकांनी गेल्या वर्षी वेळेवर मालमत्ता कर भरला आहे का याची माहिती माहिती अधिकार दिवशी घेतली असता अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले.
यामध्ये ३६ हजार २२९ मालमत्ता धारक २०२१-२२ मध्ये परत थकबाकीदार झाले असून त्यांनी ४० कोटी रुपये थकवले आहेत. ७ हजार १५४ बिगर निवासी मालमत्ता धारक २०२१-२२ मध्ये परत थकबाकीदार झाले असून त्यांनी महापालिकेचे ९७ कोटी रुपये थकवले आहेत. ओपन प्लॉट धारकांपैकी ९४५ मालमत्ता धारक २०२१-२२ मध्ये परत थकबाकीदार झाले असून त्यांनी ७ कोटी रुपये थकवले आहेत. त्याचप्रमाणे, १४१८ मालमत्ताधारक थकबाकीदार झाले असून त्यांनी सात कोटी रुपये थकवले आहेत. एकूण ४५ हजार ७४५ मालमत्ताधारकांनी यंदा परत १५१ कोटी रुपये थकवले आहेत.
अभय योजनेचा फायदा घेणाऱ्या मालमत्ता धारकांनी परत कर थकवणे म्हणजे त्यांची कर भरण्याची मानसिकता नाही असे दिसून येत आहे. असे मालमत्ताधारक परत एखाद्या अभय योजनेची वाट पाहत पुढील काही वर्षे कर थकवू शकतात. त्यामुळे २०२०-२१ या वर्षी अभय योजनेचा फायदा घेऊन दंडमाफी मिळवलेल्या थकबाकीदार मालमत्ताधारकांपैकी पुन्हा थकबाकीदार झालेल्या मालमत्ता धारकांना २०२०-२१ या वर्षी दिलेली दंडमाफी रद्द करण्यात यावी व त्याचा बोजा परत त्यांच्या मालमत्ता करात चढविण्यात यावा. आणि भविष्यात कोणत्याही अभय योजनेचा फायदा त्यांना परत कधीही देऊ नये अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे.