मुंबई- सहा महिन्यांपासून ठप्प झालेल्या एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत आहे. एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली असून सोमवारी एका दिवसांत एसटी महामंडळातील 15 हजार 185 कर्मचारी हजर झाले आहेत. सोमवारी 18 एप्रिलपर्यंत 61 हजार 647 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. महामंडळाच्या हजेरीपटावर सध्या एकूण 82,108 कर्मचारी आहेत. त्यामुळे एसटीच्या चाकांना गती मिळाली आहे.
संपकरी कर्मचार्यांना 22 एप्रिलपर्यंत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात हजर होणार्या कर्मचार्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याने कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होत आहेत. महामंडळाने बडतर्फ केलेल्या अकरा हजारांपेक्षा जास्त कर्मचार्यांना कामावर रुजू होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर येत आहेत. सोमवार संध्याकाळपर्यंत 20 हजार 303 चालक आणि 16 हजार 703 वाहक कामावर हजर झाले.
कार्यशाळा आणि प्रशासकीय मिळून एकूण 27 हजार 797 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. संपकाळात राज्यातील 250 आगारांमधील वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू होती. सोमवारी राज्यातील विविध मार्गांवर 18 हजार 512 फेर्या धावल्या. या फेर्यांतून सुमारे 18 लाख प्रवाशांनी प्रवास केला,तर महामंडळाला सुमारे 13 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचार्यांचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी ऑक्टोबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. महामंडळाने कर्मचार्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. मात्र, त्याला न जुमानता कर्मचारी संपावर ठाम होते. अखेर उच्च न्यायालयाने दखल घेऊन कर्मचार्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर येण्यास सांगितले. ज्यांच्या विरोधात बडतर्फी, निलंबन अथवा अन्य कारवाया सुरू असतील, त्या मागे घेऊन समज देऊन त्यांना कामावर घेऊ. मात्र, 22 तारखेनंतर जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असे समजून त्यांची सेवा समाप्त केली जाईल, असे परिवहनमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. एसटी महामंडळाने संपातील कर्मचार्यांना कामावर हजर होण्यासाठी आतापर्यंत सात वेळा संधी दिली. मात्र, या काळात 30 टक्केही कर्मचारी हजर होऊ शकले नाहीत. आता न्यायालयानेच 22 एप्रिलची डेडलाइन दिली आहे. तोपर्यंत हजर झाले, तर कारवाई होणार नाही. मात्र, त्यानंतर हजर होण्याची संधी मिळणार नाही.