मानवाधिकारांवर जयशंकर यांनी अमेरिकेला दिले सणसणीत प्रत्युत्तर

459 0

वॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शीखांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान भारताच्या कथित मानवाधिकार उल्लंघनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अमेरिकेला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. बिडेन प्रशासनाच्या दबावापुढे न झुकता जयशंकर यांनी अँटोनी ब्लिंकन यांच्या भारतातील मानवी हक्कांच्या स्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला आणि अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकन मानवाधिकार अहवालाला काही तासांतच समर्पक उत्तर दिले. अमेरिकेत भारतीयांच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनावर भारत लक्ष ठेवून आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जयशंकर यांच्या या वक्तव्याचे भारतीय सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.

एका प्रश्नाच्या उत्तरात अमेरिकेला स्पष्ट संदेश देताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, ‘लोकांना आमच्याबद्दल मत बनवण्याचा अधिकार आहे. त्यांच्या लॉबी आणि व्होटबँकेबद्दल मत बनवण्याचा अधिकारही आम्हाला आहे. आम्ही गप्प बसणार नाही. इतर लोकांच्या, विशेषत: आमच्या स्वतःच्या (भारतीय) समुदायाशी संबंधित असलेल्या मानवी हक्कांबद्दलही आमचे मत आहे. मानवाधिकारांच्या मुद्द्यावर भारताला सातत्याने ज्ञान देणारे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आजवरचा सर्वात कडक संदेश दिला. याच्या काही तासांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने भारतातील मानवाधिकार उल्लंघनाबाबत एक अहवाल जारी करून अनेक कडक प्रतिक्रिया दिल्या होत्या.

‘भारतातील मानवी हक्कांच्या उल्लंघनावर अमेरिका नजर ठेवत आहे’

त्याचवेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही जयशंकर यांच्या उपस्थितीत सांगितले की, त्यांचा देश भारतातील मानवी हक्क उल्लंघनावर लक्ष ठेवून आहे. यामध्ये काही सरकार, पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्यांकडून मानवाधिकार उल्लंघनाच्या वाढत्या घटनांचा समावेश आहे. ब्लिंकन हे ज्ञान भारताला देत असताना त्याच वेळी न्यूयॉर्कमध्ये दोन शीखांवर प्राणघातक हल्ला झाला. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी असेही सांगितले की या आठवड्यात भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या 2+2 मंत्रिस्तरीय बैठकीत मानवी हक्कांच्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही.

मानवाधिकाराच्या मुद्द्यावर बोलण्यास भारत मागे हटणार नाही: जयशंकर

जयशंकर म्हणाले की, जेव्हाही यावर चर्चा होईल तेव्हा भारत बोलण्यापासून मागे हटणार नाही. जयशंकर म्हणाले, ‘आम्ही या बैठकीत मानवाधिकाराच्या मुद्द्यावर चर्चा केली नाही. या बैठकीत प्रामुख्याने राजकीय-लष्करी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारत-अमेरिका 2+2 मंत्रीस्तरीय चर्चेत भाग घेण्यासाठी वॉशिंग्टन येथे आले होते. जयशंकर म्हणाले की, आज भारत-अमेरिका संबंधांमध्ये दोन्ही बाजू सहमत नसलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची ताकद आणि सहजता आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!