हरिद्वार- पुढील 15 वर्षात अखंड हिंदुस्तान होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. पुढील २० ते २५ वर्षांत अखंड भारत तयार होणार आहे, मात्र आपण सगळ्यांनी मिळून आणखी थोडा प्रयत्न केल्यास स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षांतच तयार होईल. हा भारत तयार करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही आणि जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील,’ असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत हे बुधवारी हरिद्वार येथे ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री १००८ स्वामी दिव्यानंद गिरी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आणि श्री गुरुत्रय मंदिराचं लोकार्पण करण्यासाठी हरिद्वार येथे गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले, ” हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. आपण अहिंसेबद्दल बोलू, पण हातात दंडूका घेऊन बोलू. आपल्या मनात कसलाही द्वेष किंवा वैर नाही, पण जग शक्तीला मानत असेल तर काय करणार ? जे लोक सनातन धर्माला विरोध करतात, त्या लोकांचंही या धर्मासाठी योगदान आहे. कारण त्यांनी विरोध केला नसता तर हिंदू समाज जागा झाला नसता
धर्माच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले तरच भारताचा उदय होईल. भारत वेगाने प्रगती करत आहे. त्यामध्ये कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर तो संपेल असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.