पुणे- पुणे शहरातील चिखलवाडी भागात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी भाजपचे पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पत्र पाठवले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगात पहिल्यांदाच पुणे शहरातील चिखलवाडी भागात साजरी करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेबांची जयंती भारतात व भारताबाहेर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीची सुरुवात त्यांच्या हयातीतच पुणे शहरातील चिखलवाडी येथे करण्यात आली होती. येथील जनार्दन रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ साली जगात पहिल्यांदा चिखलवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली होती.
खडकी पत्रविभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून रणपिसे यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथामधून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या. यानंतर खडकी बाजार परिसरात प्रत्येक वस्तीत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होऊ लागली. या सर्व वस्त्यांचे बाबासाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली. त्यामुळे बाबासाहेबांच्या चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या चिखलवाडी येथे बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.