पुणे : साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या (Acharya Atre) जन्मशताब्दीतोत्तर जन्म रौप्य महोत्सवी वर्ष यंदा 13ऑगस्ट रोजी सुरु होत आहे.त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करावे अशी विनंती संवादचे सुनील महाजन आणि समर्थ युवा फाऊंडेशनचे राजेश पांडे यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन केली.
या संदर्भात त्यांनी सांगितले की आचार्य अत्रे (Acharya Atre) 1938 ते 1941 या काळात पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.पुण्यात विविध शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली. नाटक,चित्रपट ,साहित्य ,शैक्षणिक,पत्रकार,वक्ते म्हणून असा बहुअंगी त्यांचा वावर होता. संवाद आणि समर्थ युवा फौंडेशन तर्फे संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
पुणे महानगरपालिकेने देखील या संदर्भात विविध उपक्रम राबवावे अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत आचार्य अत्रे (Acharya Atre) यांचे तैल चित्र लावावे ,कसबा पेठेतील निवासस्थानी नील फलक लावावा ,सावरकर भवन येथील आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करावे, आचार्य अत्रे यांची नाटके व चित्रपटांचा महोत्सव साजरा करावा आणि आचार्य अत्रे यांचे उचित स्मारक उभारावे अशा विविध मागण्या त्यांनी आयुक्तांकडे केल्या.