मुंबई: काही दिवसांपूर्वी हिंगोलीत बोलताना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपण 100% मंत्री होणार असल्याचा दावा आमदार संतोष बांगर यांनी केल्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतोष बांगर यांना मंत्रीपद मिळालं तर महाराष्ट्रामध्ये मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल असा खोचक टोला राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला.
अंबादास दानवे आज हिंगोली दौऱ्यावर असून त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला.
त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सध्याच्या सरकारइतकं अपयशी सरकार राज्यात कधीच राहीलं नाही. राज्यात भ्रष्टाचार सुरु आहे. शेतकऱ्यांचे कोणतंही काम होत नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. अतिवृष्टीची मदत देखील अद्याप झाली नाही. त्यामुळं हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारं सरकार असल्याची टीका दानवेंनी केली.