नवी दिल्ली: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज (शुक्रवार) एक वर्षं पूर्ण होत आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त काही मिळत नव्हता. अखेर मंत्रीमंडळाला मुहूर्त मिळाला असल्याची चर्चा सुरू झाली असून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल रात्री उशिरा नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारासह केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांना स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेकडून गजानन किर्तीकर, भावना गवळी, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत असून यापैकी कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.