मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निवडणूक चिन्हाचा वाद समोर आला होता अखेर शनिवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व पक्ष चिन्ह असणारा धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गद्दारांनी पक्ष फोडला, भाजपशी युती करुन सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेला संपविण्याचे कारस्थान सुरु केले. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून हे सर्व कारवाया केल्या इथे पर्यंत ठीक होतं. पण, या गद्दारांनी आता या शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचे पाप केल्याची टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर नाव न घेता केली. यावेळी त्यांनी 40 डोक्यांच्या रावणांनी प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण गोठावलं अशी टीकाही त्यांनी केली.
आज योगायोगाने कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी, लक्ष्मी येते म्हणतात हा भाग वेगळा, पण कोजागिरीचा अर्थ एकच आहे, दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे तुम्ही जागी राहा. अजिबात झोपू नका. आपल्याला शांत डोक्याने आणि आत्मविश्वासाने ही मोठी लढाई जिंकायची आहे. असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.