महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काल बुधवारी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले. एक शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावर तर दुसरा बीकेसीच्या मैदानावर… ठाकरे आणि शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपापली ताकद पणाला लावून हू म्हणून गर्दी जमवली खरी पण जमलेल्या की जमवलेल्या गर्दीच्या पारड्यात विचारांचं सोनं पडलं का हो ? आरोप-प्रत्यारोप, राग-द्वेष, तोंडसुख आणि नुसतीच उणी-धुणी याशिवाय शिवसैनिकांच्या वाट्याला काय आलं ? पाहूयात, यावरचा TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट… विचारांचं सोनं कुठलं ? इथं तर दोघांनी मिळून एकमेकांना धुतलं..!
जमलेल्या माझ्या… असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आणि आता विचारांचं सोनं लुटायला मिळणार म्हणून प्रत्येक जण कान टवकारून बसलं पण भाषण सुरू झालं आणि इथंच सारं फसलं.
उद्धव ठाकरेंच्या भाषणाची ट्रेन फलाटावरून सुटली खरी पण सुसाट सुटलेली ही ट्रेन भाजप, शहा, मोदी आणि शिंदे या चार स्टेशनांवर जाऊन अडकून पडली. गद्दार, 50 खोके, खोकासूर, कार्टं, डुकरं, बांडगूळं… तेच तेच मुद्दे आणि लटके-झटके यापलीकडं या ट्रेनच्या डब्यात दुसरं काही भरल्याचं पाहायलाच मिळालं नाही. काय होते त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पाहूयात…
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
जर तुम्ही साथ दिली तर मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन
काँग्रेस- राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवलं
माझ्यासोबत निखाऱ्यांवर चालण्याची तयारी आहे का तुमची?
या तोतयांना आपली शिवसेना पळवायची आहे. तुम्ही घेऊ देणार आपली शिवसेना ?
पूर्वी एक नाटक होत ‘तो मी नव्हेच…!’ हे उलटे आहेत तो मीच…
एक बरं झालं बांडगूळं छाटली गेली. वृक्षाची मुळं जमिनीत असतात
काय कमी दिलं त्यांना ? बाप मंत्री, कार्टं खासदार, कुणाचा आमदार, पुन्हा डोळे लावून बसलेत नातू नगरसेवक. अरे, त्याला मोठा तर होऊ दे. शाळेत तर जाऊ दे. आताच नगरसेवक ?
आता तुम्हीच सांगा, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात नवीन काय होतं ? गद्दार, खोके, बाप चोरणारी टोळी आणि हिंदुत्वाची मुळमुळीत गोळी… बसं इतकंच ना ? अहो, हे ऐकून ऐकून तर कान पिकले सर्वांचे ! हा फक्त भाजपबरोबर अडीच वर्षांचा करार झाला होता याचा पुनरुच्चार करताना त्यांनी त्यांनी यावेळी आई-वडलांची घेतलेली शपथ इतकाच काय तो वेगळा मुद्दा ! औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करताना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन आम्ही हिंदुत्व वाढवलं असा दावा केला आणि हे बोलून विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिलं. शिवतीर्थावर गर्दी तर जमली पण या गर्दीला असा कोणता ठोस कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी दिला ? या गर्दीला त्यांनी कोणती दिशा दिली ? तर याचं उत्तर कुणाकडंच नाही.
मेळाव्याला राज्यभरातून सर्वाधिक प्रसिद्धी मिळत असताना उद्धव ठाकरेंना आयती संधी चालून आली होती पण ती ही त्यांनी घालवली. मुंबई महापालिका निवडणुकीवर बोलून शिवसैनिकांना चार्ज करू शकले असते, त्याबाबचा अजेंडा मांडू शकले असते पण त्यावर त्यांनी चकारही काढला नाही. फक्त शिंदे एके शिंदे… गद्दार आणि खोके..! एकनाथ शिंदेंवर टीका करताना त्यांच्या मुलावर आणि नातवावर घसरण्याची काय गरज होती ? बोलण्याच्या ओघात बोलून गेले, असं म्हटलं तर उद्धव
ठाकरे म्हणजे एक संयमी नेतृत्व याबद्दल नेमकं काय म्हणायचं ?
असो, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाविषयी बोलू…
काय होते त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पाहूयात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
आमच्या भूमिकेला जनसामान्यांचा पाठिंबा; त्यामुळंच इतकी गर्दी जमली
हजारो शिवसैनिकांनी मिळून जो पक्ष उभारला तो आपल्या हव्यासासाठी गहाण टाकला
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली
ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची ना एकनाथ शिंदेंची ही शिवसेना तर केवळ शिवसैनिकांची
ही गद्दारी नाही गदर आहे; गदर म्हणजे क्रांती
तुम्ही म्हणतात बाप चोरणारी टोळी आली मग आम्ही
असं म्हणावं का तुम्ही बापाचे विचार विकण्याचा प्रयत्न केला
दहशतवादी याकुब मेननची फाशी रद्द करण्याची मागणी करणाऱ्या लोकांना मंत्रिपद दिलं ही गद्दारी नाही का ?
तुम्ही अडीच तास देखील मंत्रालयात गेला नाहीत; लोक तुम्हाला कंटाळले होते
फक्त सोन्याचा चमचा घेऊन येणारेच बनणार का मुख्यमंत्री ?
तुमचं वर्क फ्रॉम होम, आमचं वर्क विदाऊट होम
तुम्ही बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार
माझा मुलगा श्रीकांत म्हणजे कार्टं ? नातू नगरसेवकपदावर डोळा लावून बसलाय. एवढा बच्चू दीड वर्षांचा आहे तो रुद्रांश. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधःपतन सुरू झालं. तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा मंत्री झाला आम्ही काय बोललो ? एक मंत्री कुणीतरी ग्रामीण भागातला झाला असता ना !
जमलेल्या की जमवलेल्या… असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात एक वाचनीय भाषण केलं. मुंबईला फिरायला नेतोय, यात्रेला नेतोय, राज ठाकरेंच्या भाषणाला नेतोय, असं म्हणून शिंदे गटानं बीकेसी मैदान गर्दीनं फुगवलं आणि मुख्यमंत्र्यांनी या गर्दीसमोर लांबलचक भाषण करून गर्दीला रुसवलं. 51 फुटी तलवारीचं शस्त्रपूजन करून आणि विक्रम रचून मैदान मारता येत नसतं; मैदान विचारांनी मारायचं असतं हे इतके वर्ष बाळासाहेबांचं भाषण ऐकलेल्या शिंदेंना कसं कळलं नाही ? तुम्ही तसं केलं म्हणून आम्ही असं केलं; तुमची गद्दारी आमचं गदर, असं म्हणून आमचं काहीच चुकलं नाही, असं गर्दीच्या माथी थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न मात्र त्यांनी नक्की केला. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंची अक्षरशः दमछाक झाली… आणि मग जाता जाता कुठं तरी अरे, आपण तर या राज्याचे मुख्यमंत्री आहोत याचं भान आल्यावर होय, मी महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट घेतलंय, तुम्ही काळजी करू नका; आम्ही आजवर हे केलंय उद्या ते करू… असं म्हणत गर्दीला गोंजारण्याचा प्रयत्न केला…
एकूणच काय, दोन्ही दसरा मेळावे पाहिल्यानंतर आणि दोघांची भाषणं ऐकल्यानंतर विचारांचं सोनं सोडा साधे विचारही पदरी पडले नाहीत. अहो, आठवा ते दसरा मेळावे आणि आठवा ते बाळासाहेबांचे विचार… आठवा त्या ढाण्या वाघाची डरकाळी… उडाले ते कावळे, उरले ते मावळे…
याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्याशिवाय… एकच नेता एकच मैदान ! असो, मैदान भरवणं आणि मैदान मारणं यातला फरक न समजायला महाराष्ट्राची जनता काही दूधखुळी नाही. कालच्या दोन्ही दसरा मेळाव्यांबाबत एकच म्हणता येईल… विचारांचं सोनं कुठलं ? इथं तर दोघांनी मिळून एकमेकांना धुतलं..!
संदीप चव्हाण
वृत्त संपादक TOP NEWS मराठी