17 सप्टेंबर… मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष !

396 0

भारत स्वतंत्र झाल्यानंतर तीन संस्थानं या स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती. त्यापैकीच एक म्हणजे मराठवाडा ! स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी मराठवाड्याच्या जनतेनं निजामांशी लढा दिला. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस बळाचा वापर करून निजामांना शरण यायला भाग पाडलं आणि मराठवाडा निजामांच्या जाचातून मुक्त झाला. तो दिवस होता 17 सप्टेंबर. जाणून घेऊयात, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं महत्त्व…

15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. नुकताच आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा केला परंतु 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशाचा काही भाग पारतंत्र्यात होता. परकीयांचे अत्याचार सहन करत होता.

हा भाग मुस्लीमशासक निजाम, डच, पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. दक्षिण भारताच्या मधोमध हैदराबादचा निजाम नावाचा एक क्रूर शासक भारताच्या विभाजनाची आग्रही भूमिका घेऊन, पाकिस्तानप्रमाणं स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होता. पाकिस्तानसोबत जवळीक साधत होता. कासीम रिझवीच्या माध्यमातून हिंदू जनतेवर अनन्वित अत्याचार करत होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात 565 संस्थांनांपैकी हैदराबाद, जम्मू व काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थानं मात्र स्वातंत्र्याची वाट पाहात होती.

स्वतंत्र भारत देशाचा भाग होण्याचं स्वप्न पाहत होती. क्रूर निजामाच्या राजवटीतील हैदराबाद हे एक मोठं संस्थान होतं. मराठवाडा प्रदेश हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक असलेला महत्त्वाचा भाग होता. हैदराबाद संस्थानात तेलंगण, मराठवाडा व कर्नाटक राज्याचा काही भाग होता. एकाच भारतमातेची ही लेकरं होती परंतु, काहींना एक न्याय अन् काहींना वेगळा न्याय मिळत होता. देशाच्या स्वातंत्र्याच्या एक वर्षानंतरच्या काळात मराठवाडा आतून धगधगत होता, अत्याचार सहन करत स्वातंत्र्यासाठी लढत होता आणि याच स्वाधीनता संग्रामाला स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचं नेतृत्व लाभलं आणि मराठवाडा मुक्तीचा लढा सुरू झाला. निजाम अत्यंत धर्मांध, धूर्त, हिंदूद्वेष्टा व महत्त्वाकांक्षी होता.

त्यानं हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापासून रोखण्यासाठी कट्टरपंथी कासीम रिझवीच्या नेतृत्वाखाली ‘रझाकार’ नावानं एक क्रूर निमलष्करी दल स्थापन केलं. या दलानं मग जनतेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. मात्र याच दरम्यान देशाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद मुक्तीची सूत्रे हाती घेतली. हैदराबादमध्ये लष्करी कारवाईनं हस्तक्षेप करावा लागणार याची सरदार पटेलांना सुरुवातीपासूनच कल्पना होती.

एकीकडं काही केल्या निजाम शरण येत नाही तर दुसरीकडं सामान्य जनतेवरील अन्याय-अत्याचार वाढत चालल्याचं लक्षात येताच भारतीय प्रशासनानं 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करण्यास सुरुवात केली परंतु या मोहिमेला ‘पोलीस कारवाई’ न म्हणता ‘पोलीस ॲक्शन’ असं म्हणावं याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलं आणि मग त्याप्रमाणंच या कारवाईस संबोधण्यात आलं ‘ऑपरेशन पोलो’ ! 13 सप्टेंबरच्या सकाळी कारवाईला सुरुवात झाली. पाच विविध ठिकाणावरून सैन्य संस्थानात शिरलं. सोलापूरहून मुख्य चढाईला सुरुवात झाली. विजयवाडा, कुर्नुल, आदिलाबाद, चाळीसगावमार्गे छत्रपती संभाजीनगरकडून, वाशिममार्गे हिंगोलीकडून अशा विविध मार्गांनी भारतीय फौजा संस्थानात घुसल्या आणि एकापाठोपाठ एक भाग काबीज होत गेला. कारवाई सुरू होताच पुढील काही दिवसांत भारतीय सेनेनं हैदराबाद संस्थानामधील सर्व महत्त्वाच्या केंद्रावर ताबा मिळवला. मराठवाड्याच्या गावागावांत हा संग्राम लढला गेला. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारत देशाच्या अपुऱ्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झालं आणि मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा अविभाज्य भाग झाला. तेलुगु भाषिक तेलंगण, मराठी भाषिक मराठवाडा आणि कन्नड भाषिक कर्नाटकचा काही भाग असलेले हैदराबाद संस्थान अवघ्या चार ते पाच दिवसांत भारतात विलीन झालं. अवघ्या काही तासांत निजाम शरण आला. याचं जेवढे श्रेय तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जातं, तेवढंच श्रेय मराठवाड्यातील जनतेलादेखील जातं. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संस्थानातील जनतेनं दिलेल्या अभूतपूर्व लढ्याला अखेर यश आलं.

सर्वसामान्य जनतेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याची ओळख सांगणारा लढा म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याची नोंद भारताच्या इतिहासात कायम राहील. हा संग्राम किती मोठा होता ? यासाठी किती क्रांतिकारकांनी बलिदान दिलं ? आणि किती मोठा इतिहास रचला गेला ? हे सर्व मराठवाड्याच्या भूमीशिवाय इतर कुणीही अनुभवलेलं नाही आणि इतर कुणी ते सांगूही शकणार नाही. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!