2G स्पेक्ट्रम घोटाळा खटल्यात विशेष सरकारी वकील ते भारताचे सरन्यायाधीश; कोण आहेत उदय लळीत

254 0

नवी दिल्ली: न्‍यायमूर्ती लळीत हे देशाचे ४९ वे सरन्‍यायाधीश ठरतील. २६ ऑगस्‍ट रोजी एन. व्‍ही. रमणा सेवानिवृत्त होत आहे. सरन्‍यायाधीश निवृत्त होण्‍यापूर्वी आपल्‍या नवीन सरन्‍यायाधीशांच्‍या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करतात. त्‍यानुसार आज रमणा यांनी लळित यांच्‍या नावाची शिफारस केली.

कोण आहेत उदय लळीत ?

उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र आहेत. गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. त्यांचे आजोबा सोलापूरला वकिली करण्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. त्यांचे वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात हायकोर्टात न्यायमूर्ती होते. उदय लळीत यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून ज्येष्ठ विधिज्ञ सोराबजी यांच्यासोबत काम केले. अनेक वर्षे लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत होते. उदय लळीत १३ ऑगस्ट २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.

न्यायमूर्ती यू यू ललित हे क्रिमिनल कायद्याचे तज्ज्ञ आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व 2G खटल्यांमध्ये त्यांनी सीबीआयचे सरकारी वकील म्हणून प्रकरणांमध्ये भाग घेतला. याशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे सदस्य म्हणूनही दोन वेळा काम केले आहे.

२०१४ मध्ये त्यांनी याकुब मेननच्या याचिकेवर सुनावणी करण्यापासून स्वत:ला दूर ठेवले. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मेननची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा पुनर्विलोकन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.

२०१५ मध्ये, त्यांनी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटात निष्पक्ष खटला चालवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीपासून स्वतःला दूर ठेवले.२०१६ मध्ये, आसाराम बापू खटल्यातील मुख्य फिर्यादी साक्षीदार बेपत्ता झाल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले.

प्रसिद्ध 2G स्पेक्ट्रम घोटाळा खटल्यात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!